Modi water scheme failure : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) महत्त्वाकांक्षी योजना… ‘हर घर नल, हर घर जल!’ घोषणा मोठी, गाजावाजाही मोठा! पण भंडारा जिल्ह्यात या योजनेचा (water scheme) पुरता बोजवारा उडालाय. तुमसर तालुक्यातील हरदोली गावात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली टाकी आणि नळ जोडणी केवळ ‘शो-पीस’ ठरली आहे. गेल्या ३ वर्षांपासून या नळांना पाण्याचा (There is no water in the tap) स्पर्शही झालेला नाही.
५०० नळांना पाण्याचा एक थेंबही नाही
हे दृश्य आहे भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली-सिहोरा गावातील. जलजीवन मिशन अंतर्गत या गावात कोट्यवधींचा खर्च झाला. घराघरात नळ पोहोचले, जलकुंभ उभा राहिला. वाटलं होतं आता पाण्याचा प्रश्न सुटेल… पण झालं उलटच! गेल्या ३ वर्षांपासून या ५०० नळांमधून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. तांत्रिक दोषाच्या नावाखाली ही योजना प्रशासकीय बासनात गुंडाळून ठेवली गेली आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून योजना रखडली
प्रशासकीय ढिसाळपणा इतका की, चुकीच्या तांत्रिक नियोजनामुळे योजना रखडली. धक्कादायक बाब म्हणजे, आधीचे कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणी मिळालं नाही आणि आता त्याच चुका सुधारण्यासाठी पुन्हा २८ लाखांचा वाढीव निधी मंजूर झालाय. म्हणजे जनतेच्या कराच्या पैशांची ही शुद्ध उधळपट्टीच म्हणावी लागेल.
अधिकाऱ्यांची पळवाट, महिलांची पाण्यासाठी पायपीठ
या संपूर्ण प्रकरणावर जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता हितेश खोब्रागडे यांना विचारलं, तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर ‘बाईट’ देण्यास स्पष्ट नकार दिला. अधिकार पळवाट शोधत असले, तरी हरदोलीतील महिलांना मात्र पाण्यासाठी पायपीट करावीच लागतेय. आता या नवीन २८ लाखांनंतर तरी पाणी येणार की ही योजना कायमची ‘शो-पीस’ राहणार, हे पाहावं लागेल.






