Market Cap Loss : गेल्या आठवड्यातील शेअर बाजारातील उलथापालथीमुळं अनेक मोठ्या कंपन्यांना मोठं नुकसान झाले. सेन्सेक्समधील पहिल्या 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात घट झाली, तर तीन कंपन्यांमधील गुंतवणूकदारांना फायदा झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30-शेअर सेन्सेक्स निर्देशांक आठवड्याच्या पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये 1,829 अंकांनी, म्हणजेच अंदाजे 2.33 टक्क्यांनी घसरला. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजपासून टीसीएसपर्यंतच्या सात कंपन्यांना 2.05 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं.
हेही वाचा : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले
टाटा ते रिलायन्सपर्यंत सर्वांना धक्का :
टाटा समूहाची आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला गेल्या आठवड्यातील शेअर बाजारातील घसरणीमुळे सर्वात मोठं नुकसान झालं. केवळ पाच ट्रेडिंग दिवसांत तिचे बाजार भांडवल 8.67 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरलं आणि गुंतवणूकदारांना 66,699 कोटी रुपयांचं नुकसान झालं. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही गुंतवणूकदारांसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक नुकसान सोसणारी कंपनी ठरली. रिलायन्सचं बाजार भांडवल 50,670 कोटी रुपयांनी घसरुन 17.96 लाख कोटी रुपयांवर आले.
एचडीएफसी बँकेलाही मोठं नुकसान झालं :
टीसीएस आणि रिलायन्स व्यतिरिक्त, एचडीएफसी बँकेलाही मोठं नुकसान झालं. पाच दिवसांत तिचं बाजार भांडवल ₹23,090 कोटींनी घसरुन ₹12.08 लाख कोटींवर आलं. याशिवाय, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीचे बाजारमूल्य ₹19,670 कोटींनी घसरून ₹5.13 लाख कोटींवर आलं.
कोणत्या कंपन्यांचं नुकसान :
याशिवाय, भारती एअरटेलचं बाजार भांडवल ₹19,406.59 कोटींनी घसरून ₹11.05 लाख कोटींवर आलं. आयसीआयसीआय बँकेचं बाजार भांडवल ₹14,663.27 कोटींनी घसरुन ₹9.50 लाख कोटींवर आलं. एलटीचं बाजार भांडवल देखील ₹11,142.62 कोटींनी घसरून ₹5.52 लाख कोटींवर आलं.
घसरणीतही या कंपन्यांनी कमावला नफा :
शेअर बाजारातील घसरणीमुळं सात कंपन्यांना तोटा झाला असला तरी, पहिल्या 10 कंपन्यांपैकी तीन कंपन्या नफ्यात राहिल्या. हिंदुस्थान युनिलिव्हरचं बाजारमूल्य ₹20,652 कोटींनी वाढून ₹5.47 लाख कोटी झाले. एसबीआयचं बाजार भांडवल ₹19,522 कोटींनी वाढून ₹10.16 लाख कोटी झाले. बजाज फायनान्सच्या गुंतवणूकदारांनीही पाच दिवसांत ₹8,253 कोटी कमावले, ज्यामुळं त्याचं बाजार भांडवल ₹5.74 लाख कोटींवर पोहोचलं.
रिलायन्सचं वर्चस्व कायम :
बाजार भांडवलात घट होऊनही, मुकेश अंबानींच्या रिलायन्सने बाजारमूल्यानुसार देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत आपलं वर्चस्व कायम राखले आणि पहिले स्थान पटकावले. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, एलटी, एचयूएल आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.





