पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची दहशत वाढत आहे. जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, खेड यासह दौड आणि अहमदनगर या भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळॆ आता वाढत्या संख्येचा विचार करून महाराष्ट्र सरकारने महत्वपूर्ण मोठा निर्णय घेतला आहे.
बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वाढत्या बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बिबट्यांची वाढती संख्या पाहता नसबंदी आणि स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुषंगाने बिबट्यांच्या नसबंदी आणि स्थलांतराचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
बिबट्यांच्या स्थलांतरासाठी आणि नसबंदी साठी नियोजन समितीच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात येण्याची शक्यता आहे. या ऊसशेती आणि मानवी वस्तींमध्ये वावरणाऱ्या बिबट्याना पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात येणार आहे.
यासंदर्भात चर्चा करत असताना अजित पवार यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी करणे आवश्यक असल्याच्या सूचना भूपेंद्र यादव यांनी अजित पवार याना दिल्या. त्यानुषंगाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे. तर पुणे अहमदनगर जिल्ह्यातील १२५ बिबट्या पकडण्यात येणार असून निधी देण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवली आहे. या बिबट्यांना वनतारा प्रकल्पात पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.
बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून , जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि दौंडसह अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि पारनेर या भागात दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्या संदर्भात महावितरणला सूचना देण्यात आल्या आहे.