रिलायन्सचे अनिल अंबानी यांच्यावर संकटाची मालिका सुरूच आहे. यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठीशी असतानाच त्यांच्या मालमत्ता ही जप्त करण्यात येत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स या रिलायन्स अनिल अंबानी समुहाशी संबंधीत १८ मालमत्तांवर टाच आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने या संस्थांशी संबंधित मुदत ठेवी, बँकेतील रोकड आणि विविध कंपन्यांतील समभाग अशी एकूण १ हजार १२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अनिल अंबानी आणि इतरांवर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संचालनालय सुद्धा याप्रकरणी चौकशी करत आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. च्या अंधेरीतील व्यावसायिक इमारतींसह बॅलार्ड इस्टेट येथील रिलायन्स सेंटर, सांताक्रूझ येथील आलिशान सदनिका, अतिथीगृह अशा सात, रिलायन्स पॉवर लि. च्या दोन, रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिस प्रा. लि.चे चेन्नई येथील २३१ भूखंड तसेच सात सदनिका अशा नऊ मालमत्तांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत इंडिगोनं रिफंड प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा…; सरकारच्या कडक सूचना
याअगोदर ८ हजार ९९७ रुपयांची मालमत्ता जप्त मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कमर्शिअल फायनान्स, रिलायन्स होम फायनान्स या कंपन्यांतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार या संस्थांच्या ८ हजार ९९७ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली. या सर्व घोटाळ्यातील जप्त मालमत्ता १० हजार ११७ कोटी इतकी झाली आहे. रिलायन्स समुहावर अनेक दिवसांपासून चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
त्यामुळे या कंपनीच्या शेअरवर सुद्धा मोठा परिणाम दिसून आला. कधीकाळी सर्वोच्च उच्चांकावर असलेले शेअर एकदम रसातळाला आले आहेत. त्यात थोडीबहुत उसळी दिसली. पण या नवीन कारवाईमुळे शेअरमध्ये पुन्हा घसरण दिसली. रिलायन्सच्या कंपन्यांवरील कर्ज कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असतानाच नवीन धडाधड कारवाईमुळे गुंतवणूकदारही धास्तावले आहेत.












