विरारच्या पूर्व भागातील विजयनगर परिसरात इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली होती. या इमारत दुर्घटनेच्या 36 तासानंतर मृतांचा आकडा 17 वर गेला असून अद्याप काहीजण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून NDRF आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मंगळवारी (26 ऑगस्ट ) रात्री विरारच्या पूर्व भागातील विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर NDRF आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य सुरु केले, परंतु सुरुवातीला जेसीबीसारखी यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने ढिगारा हटवण्यात अडथळे आले. मात्र, दुपारनंतर इमारतीच्या शेजारील काही भाग पाडण्यात आल्यामुळे बचावकार्यास वेग आला.
NDRF चे बचाव कार्य अद्यापही दुसऱ्या दिवशीही सुरु असून आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून 17 रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर जखमींवर जवळपासच्या काही रुग्णालयात उपचार सुरु आहे. अनेक जण बेपत्ता होते मात्र हळू हळू त्यांचा ही शोध घेण्याचे काम शर्थीने सुरु आहे. दरम्यान, जर अजूनही कुणाचे नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती बेपत्ता असतील, तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी, असे आवाहन विरार पोलीस नागरिकांना करत आहेत.
या इमारत दुर्घटनेनंतर या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर वसई विरार महापालिकेने विरार पोलीस ठाण्यात अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला. नितल साने या बांधकाम व्यवसायिकाला विरार पोलिसांकडून अटक करण्यात केली असून त्यांनी चार मजली अनधिकृत इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये 54 फ्लॅट आणि चार गाळे होते. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53 आणि 54 नुसार गुन्हा दाखल केला असून BNS कलम 105 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
– प्रीती हिंगणे (लेखिका)