चेन्नई : तामिळनाडूमध्ये चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आणखी एक दुर्घटना घडली आहे. मंगळवारी चेन्नईतील एन्नोर औष्णिक वीज प्रकल्पात बांधकाम सुरू असताना एक कमान कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला. तर अनेक कामगार जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या एका कामगाराला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. सर्व जखमी कामगार उत्तर भारतातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय म्हणाले पोलीस :
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, उत्तर चेन्नईतील औष्णिक वीज प्रकल्पाच्या चौथ्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. तर आसाममधील ३० हून अधिक लोक तिथे काम करत होते. बांधकाम सुरू असताना कमान अचानक कोसळल्यानंतर कामगार गाडले गेले.
बचावकार्य वेगानं सुरू :
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथके घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दुर्घटनेत उत्तरेकडील राज्यांमधील नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यांचे मृतदेह स्टॅनली सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तिथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. उपचार सुरू असलेल्या कामगाराची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळताच सरकारी स्टॅनली रुग्णालयात तामिळनाडू वीज मंडळ विभागाचे सचिव आणि तामिळनाडू वीज मंडळाचे अध्यक्ष जे. राधाकृष्णन पोहोचले. त्यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्या उत्तरेकडील राज्यातील कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.
मृतांना दोन लाखांची मदत :
पंतप्रधान मोदींनी दुर्घटनेबद्दल व्यक्त केलं दु:ख- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडुच्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, तामिळनाडूतील चेन्नई येथे झालेल्या दुर्घटनेमुळे मी दु:खी आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत दिली जाईल. जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येईल.











