नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन गुरुवारी संपलं. अधिवेशन संपल्यानंतर संसद भवनात एक वेगळंच राजकीय वातावरण दिसून आलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेते एकत्र दिसले. यावेळी संसदेच्या कामकाजावर आणि अधिवेशनाच्या कामकाजावर चहापानावर अनौपचारिक चर्चा झाली.
सत्ताधारी विरोधक नेते एकत्र :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, लल्लन सिंह, किरेन रिजिजू आणि अर्जुन राम मेघवाल हे संसदेच्या या चहापानात उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे राजीव राय आणि धर्मेंद्र यादव आणि द्रमुकचे ए. राजा यांचा समावेश होता.
18वीं लोकसभा के छठे सत्र के समापन के पश्चात माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी एवं सभी दलों के गणमान्य नेताओं के साथ संसद भवन स्थित कार्यालय में सुखद वार्ता हुई। pic.twitter.com/MUXDD6opsV
— Om Birla (@ombirlakota) December 19, 2025
पंतप्रधान-प्रियंका गांधीमध्ये वायनाडवर चर्चा :
वृत्तानुसार, या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी यांनी वायनाडबद्दल सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक चर्चा केली. शिवाय, जुन्या संसद भवनाप्रमाणेच संसद भवनातही समर्पित सभागृहाची मागणी करण्यात आली. चहापानाच्या चर्चेदरम्यान, सदस्यांनी असंही म्हटलं की हे अधिवेशन खूप उपयुक्त होतं, परंतु रात्री उशिरापर्यंत विधेयकं मंजूर करणं आदर्श मानले जात नाही म्हणून ते आणखी वाढवता आलं असते. विरोधकांच्या निषेधामुळं हे अधिवेशन तुलनेनं लहान असल्याचेही हलक्याफुलक्या स्वरात नमूद करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी विनोदानं म्हटलं की त्यांना विरोधकांच्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचं नाही. या हिवाळी अधिवेशनात “जी राम जी” विधेयक, दिल्लीचे प्रदूषण आणि वंदे मातरम मुद्दा यांचा बोलबाला होता. अधिवेशनादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रभावी भाषणं दिली.
हे ही वाचा :‘जी राम जी’ विधेयक गडारोळात मध्यरात्री मंजूर; विरोधकांची निदर्शने
संसदीय परंपरेचा भाग :
ही चहापान पंतप्रधान मोदींच्या परंपरेचा एक भाग आहे, ज्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं जातं. संसदीय लोकशाहीमध्ये हे संवाद आणि सुसंवादाचं प्रतीक मानलं जातं. गेल्या पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर चहापानाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं, परंतु काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला. आता, हिवाळी अधिवेशनानंतर, चहापानावर सर्व पक्षांच्या नेत्यांची गर्दी राजकीयदृष्ट्या सकारात्मक संकेत म्हणून पाहिली जात आहे.












