Amit Shah in Kerala : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं की, “भारतीय जनता पक्षाचं ध्येय केरळला राष्ट्रविरोधी शक्तींपासून वाचवणं आणि राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणं आहे.” आता त्यांच्या विधानामुळं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम इथं बोलताना शाह म्हणाले की, तिरुअनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या यशानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. शाह म्हणाले की, जर पक्षानं चांगली कामगिरी केली तर ते पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देतील असं त्यांनी स्वतःला वचन दिलं होतं.
केरळला राष्ट्रविरोधी शक्तींपासून वाचवायचं आहे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांनी नवनिर्वाचित स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींचं अभिनंदन केलं. त्यांनी निकालांना राज्यातील पक्षाच्या मोठ्या राजकीय ध्येयाकडे एक महत्त्वाचं पाऊल म्हणून वर्णन केलं. ते म्हणाले, “आम्ही 20 टक्के मतदानापर्यंत पोहोचलो आहोत. आता, आणखी 20 टक्के मतदानापर्यंत पोहोचण्यास फार वेळ लागणार नाही.” केरळला राष्ट्रविरोधी शक्तींपासून वाचवणं हे भाजपाचं अंतिम ध्येय आहे, असं शहा यांनी पुढं सांगितलं. राज्यात सरकार स्थापन होऊन आणि भाजपाचा मुख्यमंत्री आल्यानं हे ध्येय साध्य होईल, असंही ते म्हणाले. यामुळं संपूर्ण विकासाचा मार्ग मोकळा होईल, असंही शहा म्हणाले.
अमित शहा यांनी तिरुवनंतपुरममध्ये आणखी काय म्हटलं? :
गृहमंत्र्यांनी सांगितलं की, भाजपा केरळच्या दीर्घकालीन श्रद्धा आणि परंपरांचं रक्षण करण्यासाठी तसंच सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यांनी दावा केला की राज्यातील लोक आता असा विश्वास करतात की भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच ही उद्दिष्टे साध्य करु शकते.
एलडीएफ आणि यूडीएफवर हल्ला :
अमित शाह म्हणाले की, ‘विकसित भारताचा’ मार्ग ‘विकसित केरळ’मधून जातो. त्यांनी एलडीएफ आणि यूडीएफवर परस्पर अक्षमता आणि भ्रष्टाचारामुळं स्थिरावल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पर्यायी सरकारांनी एकमेकांच्या चुकांवर कारवाई केली नाही, ज्यामुळं राज्याचं भविष्य धोक्यात आलं. आपल्या भाषणाचा समारोप करताना, गृहमंत्री अमित शहा यांनी केरळच्या लोकांना सांगितलं की, एलडीएफ किंवा यूडीएफ द्वारे विकास, सुरक्षा आणि श्रद्धेचं रक्षण करता येणार नाही. त्यांनी दावा केला की राज्याच्या भविष्यासाठी फक्त भाजपा हाच एक स्पष्ट आणि निर्णायक पर्याय आहे.






