mental health care tips : आजकालच्या धावपळीच्या जगात आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर लक्ष देणे देखील फार महत्वाचे आहे. परंतु आपण ठीक आहे म्हणत चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन मानसिक आणि शारीरिक थकवा आणि वेदना इतरांपासून लपवतो. परंतु मनातल्या मनात अनेक प्रश्न, भीती भरलेली असते. सतत च्या कामाचा ताण, नात्यांची जबाबदारी अपेक्षांचे ओझे आणि रोज होणारी धावपळ या सर्वच बाबींचा परिणाम मनावर आणि शरीरावर देखील होत असतो. आणि ते आपल्याला दिसून येत नाही. ‘जो चल रहा है वो चलने दो‘ म्हणत आपण आपले आयुष्य जगत असतो. शरीरात होणाऱ्या वेदना आपल्याला जाणवतात परंतु मनात झालेल्या वेदनांनाच काय ? त्यावर देखील लक्ष देणे गरजेचे असते.
मानसिक आरोग्य म्हणजे काय
आज आपण बोलणार असलेल्या विषय म्हणजे मानसिक आरोग्य. जसं शरीर आजारी पडलं की आपण रुग्णालयात जातो. तसं मन आजारी पडलं तर आपण काय करतो? मन आजारी पडल्यावर त्यालाही आधाराची गरज असते. मानसिक आरोग्य म्हणजे फक्त नैराश्य येणे किंवा ताणतणाव निर्माण होणे असं नाही तर आपण करत असलेला विचार, आपण घेत असलेले विचार, नातेसंबंध जपण्याची आपली पद्धत हे सर्वकाही मानसिक आरोग्यात येते. आणि मानसिक आरोग्य जपणे हे देखील आपल्या स्वतःच्या हातात असते.
पुरुषांना मानसिक आरोग्याचा त्रास जास्त
आपण अशा समाजात राहतो जिथे मानसिक आरोग्य म्हंटल की मोठा बाऊ केला जातो. आपल्या समाजात मन मोकळं करणं हे कमजोरीचे लक्षण मानले जाते. मग आपल्याला असं ऐकायला मिळतं की, तू जास्त विचार करतोस, हे मोठं कारण आहे का? सगळ्यांनाच असा त्रास असतो….परंतु हे सर्व प्रश्न ऐकून आपण आपल्या मनातलं बोलणं सोडून मनात साठवलं जातं. आणि याचा परिणाम मानसिक आरोग्यावर पडतो. मुख्यतः पुरुषांना मानसिक आरोग्याचा त्रास जास्त उद्भवतो. महिला बोलून व्यक्त होतात यामुळे त्यांचं मन साफ असतं. परंतु पुरुष मनात साठवून ठेवतात. सर्वकाही सांभाळण्याची जबाबदारी, अपेक्षांचे ओझे या सर्वच गोष्टींमुळे मनातलं बोलणं मागे पडत जातं. परंतु मनात साठलेलं सर्वकाही ओझं बनत जातं.
मानसिक तणावाचे कारण
जेव्हा आपण आपल्या मनातल्या भावना दाबून ठेवतो. तेव्हा त्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडत असतात. चिडचिड, राग, एकटेपणा, झोप न लागणे, भूक न लागणे, सततचा थकवा, आत्मविश्वास कमी होणे या कोणत्या ना कोणत्या रूपात ते बाहेर पडत जाते. आणि हेच मानसिक तणावाचे खास कारण आहे.
व्यक्त होणे गरजेचे
मुळात बोलणं म्हणजे काय ? तर बोलणं म्हणजे तक्रार करणे नाही तर बोलणं म्हणजे आपल्याला काय वाटतंय हे मोकळेपणाने सांगणे, मन हलकं करणं, मनातील सर्वकाही बोलून मन मोकळं करणं. मग हे बोलणं एकत्र मित्रांसोबत असू शकतं, किंवा जोडीदार, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत किंवा गरज असल्यास कौन्सिलरसोबत असू शकतं.












