Murtijapur water shortage : जगाच्या पाठीवर सर्वाधिक तापमान नोंदवणाऱ्या अकोला जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याची झळ सुरुवातीलाच जाणवू लागली असून, मूर्तिजापूर शहरातील घरकुल परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे ६०० घरांचा हा विस्तीर्ण परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
हेही वाचा – आरक्षित भूखंड विक्री वरून गणेश नाईक आक्रमक, एकनाथ शिंदेवर थेट हल्लाबोल
घरकुल परिसरात नियमित पाणीपुरवठा नसल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. आधीच प्रखर उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पाण्याअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच परिसरात कचऱ्याची समस्या, स्वच्छतेचा अभाव आणि शौचालयांची गैरसोय असल्याने अनेक नागरिकांना आजही उघड्यावर शौचास जावे लागत आहे.
निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने
या गंभीर समस्यांकडे मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच अन्य लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. “निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने दिली गेली, मात्र निवडणूक संपताच कोणीही आमच्या परिसराकडे फिरकूनही पाहत नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
आमच्याशी जनावरांसारखी वागणूक का दिली जाते?
“आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आम्हीही माणसं आहोत, मग आमच्याशी जनावरांसारखी वागणूक का दिली जाते?” असा थेट सवाल घरकुलवासीयांनी उपस्थित केला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची भीती असून, तातडीने पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








