Ajit Pawar Plane Crash | 28 जानेवारी रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. अजित पवारांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अजितदादांचा खरचं अपघात झाला की घातपात झाला? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. गेल्या महिन्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर करत अजित पवारांच्या अपघाताबाबत शंक व्यक्त केली आहे. यादरम्यान, आता या दुर्घटनेबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं (CID) आपली पहिली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
सीआयडीकडून हा फक्त अपघात होती की घातपात होता, या दोन्ही शक्यतांची सखोल चौकशी केली जात आहे. याबाबतची माहिती स्वत: सीआयडीने दिली असून त्यांच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या मृत्यूबाबतचे गूढ अधिकच वाढत चालले आहे.
हेही वाचा – “कबुतरं चोरीला गेली की गुन्हा दाखल होतो, मग अजितदादांच्या अपघाताचा का नाही?”; रोहित पवार संतप्त सवाल
सीआयडीच्या तपासात काय आढळले?
सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) या अपघाताचा तांत्रिक तपास करत आहे. तर अद्याप AAIB कडून या तपासाचा सविस्तर अहवाल मिळालेला नाहीये. पण हा अहवाल तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच सध्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला असून त्यातील डेटाचे सखोल विश्लेषण सुरू आहे.
काल (26 फेब्रुवारी) सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी अजित पवारांच्या अपघाताचा तपास कसा सुरू आहे, या तपासात आत्तापर्यंत कोणत्या गोष्टी समोर आल्या याबाबतची माहिती दिली.
सुनील रामानंद म्हणाले की, आम्ही या केसमधील मानवी आणि तांत्रिक अशा दोन्ही बाजूंचा तपास करत आहोत. जर आम्हाला या तपासादरम्यान कोणताही खून, गुन्हेगारी कट, जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा आढळला तर आम्ही लगेच औपचारिक एफआयआर दाखल करू. सोबतच कठोर कारवाई देखील करू, असे रामानंद यांनी सांगितले.












