Citizens’ hunger strike : अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर एकतानगर परिसरातील ३१ घरांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न काढता घरांवर कारवाई केल्याचा आरोप करत नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
कारवाई झाल्यानंतरही स्थानिक नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असून प्रशासनाने तातडीने पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. एकतानगर येथील ३१ घरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात नागरीकांनी आंदोलन छेडले आहे.
आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशीही अनेक महिला उपोषणस्थळी सहभागी झाल्या. महिलांनी रस्त्यावर उतरून सरकार आणि प्रशासनावर तीव्र प्रश्न उपस्थित केले. “लाडक्या बहिणींचा सन्मान करण्याच्या घोषणा दिल्या जातात, मात्र आज त्या बहिणींच्याच घरांवर कारवाई होत आहे,” असा आरोप महिलांनी केला. महिला दिनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने काही प्रमाणात महिलांमध्ये नाराजी पसरत असताना दिसत आहे.
दरम्यान, या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. पुनर्वसनाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.











