Dharashiv Zilla Parishad : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदासाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू असून शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस वाढली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी अवघा एक दिवस उरला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटातील सदस्यांनी मुंबईत एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून अध्यक्षपदावर ठाम दावा केला आहे. त्यामुळे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या वाटा अधिकच बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच, भाजप-शिंदे सेनेचा दावा कायम
भाजप हा १९ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. अध्यक्षपदासाठी विविध पक्षांकडून जोरदार लॉबिंग सुरू असून सत्तेच्या समीकरणात सतत बदल होताना दिसत आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेतील ५५ जागांसाठी ३३ जागांसह महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू आहे. या ठिकाणी भाजप हा १९ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदेच्या शिवसेनेला इथे १५ जागा मिळाल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला ८ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागा, काँग्रेस -३ तर अपक्षांना ४ जागा जिंकता आल्या आहेत. येथे बहुमतासाठी २८ जागांचा आकडा आवश्यक आहे.
अर्चना पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दाव्याला मोठे आव्हान
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटातील सदस्य मुंबईत एकत्र आले असून 15 सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, प्रवक्ते योगेश केदार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचाच दावा असल्याचे ठामपणे मांडण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दाव्याला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचाच हक्क
“धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचाच हक्क आहे. आमचे सर्व सदस्य एकत्र असून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.” दरम्यान, सत्ता स्थापनेच्या या राजकीय घडामोडींमुळे धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठीची लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना सर्व पर्याय खुले ठेवत असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.








