Kalyan-Ahilyanagar Highway Accident | राज्यात अपघातांचे (Accident) सत्र काही कमी होत नाहीये. आत्तापर्यंत आपण अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या पाहिल्या आहेत. तर आताही कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मोठा अपघात घडला आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका इको कारचा आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचे व्हिडीओ? रोहित पवारांचा मोठा दावा, केली मोठी मागणी
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, एक इको कार कल्याण ते मुरबाड या मार्गाने जात होती. यादरम्यान या गाडीमध्ये 12 प्रवासी कोंबून भरले होते. तर ही गाडी भरधाव वेगाने मुरबाडच्या दिशेने जात होती. यावेळी रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकची आणि प्रवाशांनी भरलेल्या इको कारची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला. तर या भीषण अपघातात 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची ही घटना घडताच संबंधित परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली आणि मदत केली. तसेच या अपघाताची माहिती टिटवाळा पोलिसांना समजताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर जखमी प्रवाशांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाता 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर या मृतांमध्ये 5 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. तर अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली असून तेथील नागरिकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलीस सध्या या अपघाताच्या घटनेचा पुढील तपास करत आहेत.












