Rohit Pawar On Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. याचे काही धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या प्रकरणी अनेक पीडित महिलांनी अशोक खरात विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांनी खरातवर गुन्हे दाखल केले असून सध्या या प्रकरणाचा संपूर्ण तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. अशातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केलं असून त्यांनी खळबळजनक दावा केला आहे.
हेही वाचा – बायको कुठे लपून बसलीये? विचारताच अशोक खरातनं दिलं विचित्र उत्तर, पोलिसही चक्रावले
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, नाशिकमध्ये आत्तापर्यंत 35 हनी ट्रॅप प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला का? काही अधिकाऱ्यांना गप्प का केलं? या प्रकरणात नेमकी काय कारवाई करण्यात आली? व्हिडीओ बाहेर कसे आले? हे व्हिडीओ सामान्य लोकांचे आहेत असं सांगितलं जातं, मात्र खरंतर यामध्ये राजकीय लोकांचे व्हिडीओ आहेत. हे व्हिडीओ कुणाचे आहेत, त्यामध्ये कोण कोण आहे, हे सर्व समोर आलं पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अशोक खरातसोबत राजकीय लोकांचे व्हिडीओ आहेत का? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, खरात प्रकरणात आज जर कोणाची चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा. यामध्ये सर्व नेत्यांची चौकशी व्हायला पाहिजे. लोकं एसआयटीचा चुकीचा वापर करत आहेत, काहीतरी लपवत आहेत. तसेच काही लोकं म्हणत आहेत की आमच्या लोकांचे व्हिडीओ पुढे येऊ देऊ नका. सिस्टिम क्लियर करण्यासाठी एसआयटीचा वापर करा, असं काहीजण म्हणत आहेत, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवारांनी काय केली मागणी?
पुढे रोहित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजप पक्षाकडून आपल्या मित्रपक्षांना संपवण्यासाठी असे प्रकार केले जातात. नितीश कुमारचं काय झालं? साताऱ्यामध्ये काय चाललं आहे? असे सवालही रोहित पवारांनी उपस्थित केले. तसेच रोहित पवारांनी खरातच्या जमिनींच्या मुद्द्यावर मोठी मागणी केली. ते म्हणाले की, खरातच्या सर्व जमिनी विका आणि त्या पैशांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापर करा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
दरम्यान, रोहित पवारांनी केलेल्या या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. ढोंगी खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध होते त्यामुळे आता रोहित पवारांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.












