Jal Jeevan Mission Fund Misuse : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा उद्देश प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र महाड तालुक्यातील कुर्ले बौद्धवाडी येथे या योजनेची प्रत्यक्ष स्थिती पाहिली तर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गावात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी उभारण्यात आली, विहीर खोदण्यात आली, पाइपलाइन टाकण्यात आली आणि घराघरांत नळ कनेक्शनही देण्यात आले.
कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवात ग्रामस्थांच्या नळाला अजूनही पाणी मिळालेले नाही. विशेष म्हणजे विहिरीत पाणी उपलब्ध असूनही पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. परिणामी ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा एवढा लाखो रुपयांचा निधी कोणाच्या घशात घेतला? अशा आक्रमक प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून येत आहेत.
महिलांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आजही
गावातील महिलांच्या दैनंदिन जीवनावर या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम होत आहे. सकाळी लवकर उठून पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आजही महिलांवर आली आहे. अनेकांना डोंगरदऱ्यांमधील खड्डे, ओढे आणि पाणवठ्यांमधून पाणी भरून आणावे लागत आहे. विशेष म्हणजे जलजीवन मिशनची कामे सुरू झाल्यानंतर गावाला पुरवण्यात येणारी टँकर सेवा देखील बंद करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वेळ, श्रम आणि आरोग्य यांच्यावर परिणाम
त्यामुळे आधीच असलेली अडचण आणखी वाढली आहे. शासनाने योजना आणली, पण पाणी दिले नाही आणि टँकरही बंद केला, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. महिलांच्या या व्यथा केवळ पाण्यापुरत्याच मर्यादित नाहीत. पाण्यासाठी दररोज दोन किलोमीटरहून अधिक अंतर पार करताना त्यांचा वेळ, श्रम आणि आरोग्य यांच्यावर परिणाम होत आहे.
जलजीवन मिशनच्या नावाखाली लाखो रुपये खर्च
उन्हाळ्याच्या दिवसांत ही परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. घरगुती कामे, शेतीची कामे आणि मुलांची जबाबदारी सांभाळताना महिलांना पाण्यासाठी वेगळाच संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन मिशनच्या नावाखाली लाखो रुपये खर्च झाले असताना नागरिकांना आजही पाण्यासाठी भटकावे लागत असेल तर या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कामे निकृष्ट दर्जाची असून काही कामे अद्याप अपूर्ण
दरम्यान, गावात करण्यात आलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबतही ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले आहेत. अनेक कामे निकृष्ट दर्जाची असून काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पाइपलाइनमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या मते संबंधित ठेकेदाराला कामाची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र काम पूर्णत्वास गेलेले नसताना देयके कशी मंजूर झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.










