Parth Pawar Chhagan Bhujbal Tender Clash : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि संवेदनशील अशा धान्य वाहतूक तसेच पुरवठा कंत्राट निघतंय, मात्र त्याच्या वाटपावरून महायुती सरकारमधील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातप्रचंड मोठा राजकीय भूकंप झाला आहे. छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात एका विशिष्ट कंत्राटदाराला टेंडर देण्याच्या मुद्द्यावरून बंद दाराआड अत्यंत तीव्र स्वरूपाची शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा सध्या जोरदार सुरूय. सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या या महाकाय टेंडर प्रक्रियेत आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला प्राधान्य मिळावे किंवा त्यालाच ते कंत्राट बहाल केले जावे, असा आग्रह पार्थ पवार यांच्याकडून धरण्यात आला होता. परंतु, प्रशासकीय नियम, पारदर्शकता आणि कायदेशीर बाबींचा हवाला देत छगन भुजबळ यांनी या दबावासमोर झुकण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
भुजबळांच्या या ठाम नकाराने संतप्त झालेल्या पार्थ पवार यांनी थेट ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीतच वाद घातल्यामुळे मंत्रालयापासून ते थेट देवगिरी बंगल्यापर्यंतच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस, ज्येष्ठ नेते विरुद्ध पक्षाची नवी युवा पिढी यांच्यातील सुप्त संघर्ष आणि सत्तेच्या केंद्रावरून चाललेली रस्सीखेच आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि शासकीय टेंडर प्रक्रियेतील आर्थिक हितसंबंधांशी जोडलेली आहे.
निविदेचे मूल्य हजारो कोटी रुपयांच्या घरात
अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत दरवर्षी राज्यातील कोट्यवधी शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. या धान्याची गोदामांतून विविध रेशन दुकानांपर्यंत वाहतूक करणे आणि पुरवठ्याचे व्यवस्थापन करणे यासाठी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे काढली जातात. या कंत्राटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील अनेक मोठे व्यावसायिक आणि राजकीय वरदहस्त असलेले कंत्राटदार नेहमीच उत्सुक असतात. नुकतीच अशाच एका मोठ्या वाहतूक आणि पुरवठा कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. या निविदेचे एकूण मूल्य हजारो कोटी रुपयांच्या घरात असल्यामुळे सुरुवातीपासूनच या टेंडर प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
इतर काही कंपन्यांनी कमी दराची निविदा भरल्याचे समोर
याच दरम्यान, पार्थ पवार यांनी एका विशिष्ट मोठ्या ठेकेदाराची शिफारस छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. इतकेच नव्हे तर, पार्थ पवार यांनी संबंधित ठेकेदाराला थेट भुजबळांच्या शासकीय कार्यालयात आणि निवासस्थानी पाठवून त्यालाच हे काम मिळवून देण्याबाबत गळ घातली होती. सुरुवातीला भुजबळ यांनी या विषयावर नियमांनुसारच कारवाई होईल असे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, जेव्हा कंत्राटदाराची कागदपत्रे आणि निविदेच्या अटींची तपासणी झाली, तेव्हा तो ठेकेदार काही तांत्रिक निकषांमध्ये बसत नसल्याचे किंवा त्याच्यापेक्षा इतर काही कंपन्यांनी कमी दराची निविदा भरल्याचे समोर आले. शासकीय नियमांनुसार, सर्वात कमी दराची आणि निकष पूर्ण करणाऱ्या कंपनीलाच टेंडर देणे बंधनकारक असते. जर यात कोणताही फेरबदल केला किंवा वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप करून अटी शिथिल केल्या, तर भविष्यात कॅग, न्यायालय किंवा विरोधी पक्षांकडून गंभीर आक्षेप घेतले जाऊ शकतात, याची पूर्ण जाणीव छगन भुजबळ यांना होती.
मंत्र्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे पार्थ पवार अत्यंत आक्रमक
भुजबळ हे राज्यातील अत्यंत अनुभवी, जुने जाणते आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक मंत्रालये सांभाळली असून, टेंडर प्रक्रियेतील कायदेशीर अडचणींचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी थेट हस्तक्षेप करून त्या विशिष्ट ठेकेदाराला कंत्राट देण्यास किंवा टेंडरच्या अटींमध्ये फेरबदल करण्यास साफ नकार दिला. भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे संबंधित कंत्राटदार नाराज झाला आणि त्याने ही सर्व माहिती पार्थ पवार यांच्या कानावर घातली. आपला शब्द पडल्यामुळे आणि आपल्या शिफारसीला ज्येष्ठ मंत्र्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे पार्थ पवार अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी थेट मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर या विषयाचा छडा लावण्याचे ठरवले.
पार्थ पवार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने छगन भुजबळांचा संयम सुटला
ज्यावेळी देवगिरीवर पक्षाची एक महत्त्वाची बैठक किंवा नेत्यांची भेट सुरू होती, नेमक्या त्याच वेळी पार्थ पवार यांनी छगन भुजबळ यांच्यासमोर या टेंडरचा विषय अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. देवगिरी बंगल्यावरील त्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती समोर आली आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे. पार्थ पवार यांनी भुजबळ यांना थेट प्रश्न विचारत, “आमच्या माणसाचे काम का केले जात नाही? तुम्ही पक्षात ज्येष्ठ आहात, पण आमच्या शिफारसीची काही किंमत नाही का?” अशा स्वरूपाचे विचारणा केली. त्यावर छगन भुजबळ यांनी सुरुवातीला अत्यंत संयमाने उत्तर देत, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून असे काम करता येत नाही आणि यामुळे सरकार तसेच मंत्रालयाची नाहक बदनामी होऊ शकते, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पार्थ पवार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा आवाज चढत गेल्याने छगन भुजबळ यांचाही संयम सुटला.
बेकायदेशीर कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नाही
भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत पार्थ पवार यांना सुनावले की, “तुम्ही अजून राजकारणात आणि प्रशासनात नवीन आहात. टेंडर प्रक्रिया कशी चालते, त्याचे कायदे काय आहेत, याची तुम्हाला माहिती नाही. मी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नाही आणि पक्षाच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचे वागतोय, तर तुम्ही खुशाल मुख्यमंत्र्यांकडे किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू शकता.” भुजबळ यांच्या या रोखठोक आणि अत्यंत कडक भूमिकेमुळे बैठकीतील वातावरण कमालीचे तापले. या वादामुळे तिथे उपस्थित असलेले इतर ज्येष्ठ नेते हे देखील काही काळ अवाक झाले. वाद इतका विकोपाला गेला होता की पार्थ पवार अत्यंत संतप्त होऊन तरातरा देवगिरी बंगल्याबाहेर निघून गेले.












