Niti Aayog : सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना करुन अशोक कुमार लाहिरी यांची उपाध्यक्षपदी आणि पाच पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ के. व्ही. राजू, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक एम. श्रीनिवास आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव अभय करंदीकर यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहिरी, शास्त्रज्ञ गोवर्धन दास आणि माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा या सर्व नवीन पूर्णवेळ सदस्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : राज्यसभेत आपला मोठा धक्का; राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदार भाजपमध्ये
पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन :
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केले, “सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. मी अशोक कुमार लाहिरी यांचं उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करतो. तसेच मी राजीव गौबा, के. व्ही. राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि एम. श्रीनिवास यांचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करतो. मी त्या सर्वांना यशस्वी आणि प्रभावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.”
नीती आयोग भारताच्या धोरण रचनेत एक महत्त्वाचा आधारस्तंभ :
पंतप्रधान म्हणाले की, नीती आयोग भारताच्या धोरण रचनेत एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे, जो सहकारी संघराज्यवादाला प्रोत्साहन देतो, सुधारणांना पुढे नेतो आणि जीवनमान सुलभ करण्यास प्रोत्साहित करतो. ते म्हणाले, “हे विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेष आणि दीर्घकालीन धोरणात्मक विचारांसाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करते.”
भारताचे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष :
हे लक्षात घेतले पाहिजे की नीती आयोगाच्या अध्यक्षपदावर भारताचे पंतप्रधानच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. नियुक्तीनंतर शनिवारी लाहिरी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार असलेले लाहिरी हे भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि १५ व्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत. ते सध्या सुरू असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवार नाहीत.





