Train Luggage Rules : रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, भारतीय रेल्वेनं ट्रेनमध्ये सामान नेण्यासंबंधी नियम तयार केले आहेत. या नियमांनुसार, डब्यांच्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये प्रत्येक सीटमागे सामानाची एक निश्चित मर्यादा आहे. जर एखादा प्रवासी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असल्याचं आढळल्यास, प्रवास केलेल्या किलोमीटर आणि सामानाच्या वजनानुसार दंड आकारला जातो. रेल्वेने हे नियम प्रवाशांच्या सोयीसाठी, सहप्रवाशांना प्रवासादरम्यान, गाडीत चढताना आणि उतरताना अडचणी येऊ नयेत आणि सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी लागू केले आहेत.
हेही वाचा : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले
प्रवासी ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकतात? :
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, एक प्रवासी जनरल क्लासमध्ये जास्तीत जास्त 35 किलो सामान (बॅग, ब्रीफकेस, ट्रॉली इत्यादी) घेऊन जाऊ शकतो. त्याचप्रमाणे स्लीपर क्लास आणि थर्ड एसीसाठी ही मर्यादा 40 किलो आहे. सेकंड एसीसाठी, ही मर्यादा प्रति प्रवासी 50 किलो आहे आणि फर्स्ट एसीसाठी, ही मर्यादा प्रति प्रवासी 70 किलो आहे. ही मर्यादा वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना लागू होते. समजा तुम्ही थर्ड एसीमध्ये कुटुंबातील इतर चार सदस्यांसोबत प्रवास करत आहात, ज्यात पाच वर्षांखालील दोन मुलांचा समावेश आहे. तुमच्या सामानाचं एकूण वजन 120 किलोपेक्षा जास्त नसावं.
प्रवाशांकडे अतिरिक्त सामान असल्यास त्यांनी काय करावं? :
जर एखादा प्रवासी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असल्याचं आढळल्यास, कापलेल्या अंतरासाठी (किलोमीटर) आणि अतिरिक्त वजनासाठी दंड आकारला जातो. रेल्वेच्या नियमांनुसार, तुमच्याकडे अतिरिक्त सामान असल्यास, तुम्हाला रेल्वे पार्सल विभागाकडे त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यानंतर तुमचं सामान ट्रेनच्या मागील डब्यात ठेवले जाते आणि तुमच्या गंतव्य स्थानकावर उतरवले जाते.




