Monsoon Adhiveshan 2026: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेतील वातावरण चांगलेच तापले. आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची देवाणघेवाण झाली. यावेळी शिंदे यांनी “कोण होतास तू, काय झालास तू” असा टोला लगावत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नेमका हा वाद कशावरून रंगला, जाणून घेऊयात.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Adhiveshan 2026) दुसऱ्या दिवशी विधानसभेतील वातावरण चांगलेच तापले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक रंगली.
सभागृहात काही मंत्र्यांच्या खात्यांशी संबंधित प्रश्नांना इतर मंत्र्यांकडून उत्तरे दिली जात असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. संबंधित मंत्र्यांनी स्वतःउपस्थित राहून उत्तर द्यावे, अशी मागणी करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकारकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी गदारोळ केला आणि काही काळ कामकाजही ठप्प झाले. (Aditya Thackeray vs Eknath Shinde)
आदित्य ठाकरेचा थेट निशाणा
यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. “मंत्री स्वतःच्या खात्याचा अभ्यास करत नाहीत. उत्तर द्यायची वेळ आली की जबाबदारी दुसऱ्यांवर टाकली जाते. आमच्या सरकारच्या काळात कोणत्याही मंत्र्याने अशी पळवाट काढली नव्हती,” असा दावा त्यांनी केला. तसेच सभागृहात दिल्या जाणाऱ्या काही स्पष्टीकरणांवरही त्यांनी आक्षेप घेतला.
विरोधकांच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. “सभागृहात बसून चर्चा करण्याऐवजी गदारोळ घालण्याची सवय काही लोकांना लागली आहे. थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत,” असा टोला त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले उत्तर
याचवेळी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत “कोण होतास तू, काय झालास तू” अशी टिप्पणी केली. तसेच सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सक्षम असून विरोधक केवळ राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या शाब्दिक संघर्षामुळे विधानसभेतील वातावरण आणखी तापले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद पुढे सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी रंगलेल्या या खडाजंगीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेतील वातावरण चांगलेच तापले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक रंगली.











