NCERT Class 9 Social Science Book: NCERT च्या नववी इयत्तेच्या सामाजिक शास्त्राच्या नव्या पाठयपुस्तकाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. चला तर जाणून घेऊयात महिलांच्या स्थानाबाबत काय सांगितलं आहे.
NCERT च्या नववी इयत्तेच्या सामाजिक शास्त्राच्या नव्या पाठयपुस्तकाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. या पुस्तकात प्राचीन भारतीय समाजव्यवस्था, महिलांची भूमिका आणि सामाजिक रचनेबाबत माहिती देताना मनुस्मृतीचाही संदर्भ समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच काळानुसार महिलांचे समाजातील स्थान कसे बदलत गेले, याचाही आढावा या धड्यात देण्यात आला आहे.
हेही वाचा: यंदा वटपौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
वैदिक काळातील महिलांची भूमिका
पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, वैदिक काळात महिलांना समाजात महत्वाचे स्थान होते. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. धार्मिक विधींमध्ये सहभागी होता येत होते आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेतही त्यांच्या सहभाग होता. प्राचीन साहित्यात उल्लेख असलेल्या काही विदुषी महिलांची उदाहरणेही या धड्यात देण्यात आली आहेत.
मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश
या पाठयपुस्तकात मनुस्मृतीतील ” यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” हा श्लोक उद्धृत करण्यात आला आहे. या श्लोकाचा अर्थ, “जिथे महिलांचा सन्मान केला जातो, तिथे देवतांचा वास असतो,” असा सांगण्यात आला आहे, याच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
महिलांच्या स्थानातील बदल
पुस्तकात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, इतिहासाच्या विविध टप्प्यांवर महिलांची स्थिती एकसारखी राहिली नाही. समाजव्यवस्था, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक बदलांमुळे त्यांच्या अधिकारांमध्ये आणि भूमिकेत बदल झाले. तरीही महिलांनी कुटुंब, शेती, अर्थकारण आणि समाजजीवनात सातत्याने योगदान दिले, असे पुस्तकात नमूद आहे.
‘भारत आणि विश्व’ या प्रकरणात विशेष उल्लेख
सामाजिक शास्त्राच्या ‘भारत आणि विश्व’ या प्रकरणात वैदिक संस्कृतीचे वर्णन करताना त्या काळातील महिलांना शिक्षण, विवाहाचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जीवनात सहभागाचे अधिकार असल्याचे सांगितले आहे. महिलांना अनेक बाबतीत पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळत असल्याचाही उल्लेख या धड्यात करण्यात आला आहे.
नव्या वादाची शक्यता
काही दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर तो प्रस्ताव मागे घेण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर आता NCERT च्या नववीच्या पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा संदर्भ समाविष्ट झाल्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा आणि वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










