Vat Purnima 2026: हिंदू धर्मांत विवाहित महिलांसाठी या सणाला विशेष महत्त्व असून, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी विवाहित जीवनासाठी या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. जाणून घ्या वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, पूजेचा विधी आणि या दिवसाशी संबंधित पारंपरिक श्रद्धा.
हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि काही इतर राज्यांमध्ये हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची पूजा करून उपवास करतात.
हेही वाचा: बुधवारी ग्रहांचा मोठा फेरबदल! ‘या’ राशींचे नशीब उजळणार, करिअर आणि आर्थिक लाभाचे संकेत
वटपौर्णिमा कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. यंदा हा सण २९ जून २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे.
वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
वटपौर्णिमेचा संबंध सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेशी जोडला जातो. पुराणांनुसार, सत्यवानाचा मृत्यू निश्चित असल्याचे समजल्यानंतरही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. नियोजित दिवशी सत्यवानाचा वडाच्या झाडाखाली मृत्यू झाला. त्यावेळी सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, बुद्धिमत्ता आणि भक्तीच्या जोरावर यमराजाकडून पतीचे प्राण परत मिळवले.
या घटनेच्या स्मरणार्थ वडाच्या वृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे वटवृक्ष हा दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो.
वटपौर्णिमेला पूजा कशी केली जाते?
या दिवशी महिला सकाळी स्नान करून पारंपरिक वेशभूषेत वटवृक्षाजवळ जातात. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि जल अर्पण केले जाते. त्यानंतर झाडाभोवती सूत किंवा कच्चा दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घातली जाते. सावित्री-सत्यवानाची कथा ऐकून किंवा वाचून पूजा पूर्ण केली जाते.
वटपौर्णिमेला उपवास का केला जातो?
या दिवशी केला जाणारा उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून वैवाहिक नात्यातील विश्वास, समर्पण आणि कुटुंबाच्या कल्याणाची भावना व्यक्त करणारा मानला जातो. अनेक महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा झाल्यानंतरच तो सोडतात.










