Rohit Shetty House Firing Responsibility : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी टॉवर निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित कुख्यात गँगस्टर शुभम लोनकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे.
शुभम लोणकर आरा बिश्नोई या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ‘शुभम लोणकर, आरा बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन शांडू-याच्या नावाने रोहित शेट्टी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली. पोस्टमध्ये कामात हस्तक्षेप करू नका, असे अनेकदा सांगितले; पण ऐकले नाही.’ हा केवळ ट्रेलर आहे आणि ऐकले नाही तर गोळ्या ‘छातीत घातल्या जातील’ म्हणत बॉलिवूड उद्योगालाही धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा – मुंबईत मानवी तस्कारी टोळी सक्रिया, ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता
शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवाशी
दरम्यान हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेव्हरी या गावचा रहिवासी असून आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते.
शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार
शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होता. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. शुभम गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जमिनावर सुटका झाली होती.
शुभम लोणकरने पुण्याला आपले भरती केंद्र बनवले
शुभम लोणकरने केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आपले जाळे पसरवले आहे. तो अकोल्यातील आपल्या जुन्या संपर्कांचा वापर शस्त्रे मिळवण्यासाठी करतो, तर त्याने पुण्याला आपले भरती केंद्र बनवले आहे. तो धायरी आणि कर्वे नगरसारख्या भागातील बेरोजगार तरुणांना धर्म आणि देशभक्तीच्या नावाखाली आमिष दाखवून आपल्या टोळीत भरती करतो. शिवाय, मुंबई आणि ठाण्यातील त्याचे साथीदार व्यावसायिक आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकावतात.
बाबा सिद्दीकी हत्याकांडानंतर, बिश्नोई टोळीतील शुभमची प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता, गोल्डी ब्रारने टोळीशी संबंध तोडल्यानंतर, तो अनमोल बिश्नोईनंतर टोळीतील तिसरा सर्वात प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अनेक पथके त्याचा शोध घेत आहेत, परंतु तो सतत त्याचे स्थान बदलून त्यांच्यापासून सुटका करत आहे.












