India Space Station 2035: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अंतराळ मोहिमांबाबत मोठे वक्तव्य केले. २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. नेमके हे स्पेस स्टेशन कसे उभारले जाणार? जाणून घ्या आजच्या खास लेखातून.
भारत अंतराळ क्षेत्रात सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अंतराळ मोहिमांबाबत भाष्य करत देशाच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चांद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एव्हड्यावरच भारत थांबलेला नसून आता गगनयान मोहिमेसह स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याच्या दिशेनेही देश वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने यापूर्वीच २०३५ (India Space Station 2035) पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) उभारण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे.
हेही वाचा: नाशिकमध्ये राजकीय खळबळ! ठाकरे गटातील नगरसेवकांबाबत मोठी चर्चा; पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं?
स्पेस स्टेशन म्हणजे नेमके काय?
स्पेस स्टेशन म्हणजे पृथ्वीभोवती कक्षेत फिरणारे असे एक मोठे अंतराळ संशोधन केंद्र, जिथे अंतराळवीर अनेक महिने वास्तव्यास राहून विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात संशोधन, नवीन तंत्रज्ञानाची चाचणी आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांची तयारी यासाठी अशा स्थानकांचा वापर केला जातो.
स्पेस स्टेशनची उभारणी कशी केली जाते?
स्पेस स्टेशन एकाच रॉकेटमधून अंतराळात पाठवणे शक्य नसते. त्यामुळे त्याचे अनेक स्वतंत्र मॉड्यूल्स तयार केले जातात. प्रत्येक मॉड्यूल पृथ्वीवर तयार करून वेगवेगळ्या मोहिमांद्वारे अंतराळात पाठवले जाते.
यानंतर अंतराळवीर किंवा स्वयंचलित प्रणाली या मॉड्यूल्सना कक्षेत एकमेकांशी जोडतात. सर्व भाग यशस्वीपणे जोडले गेल्यानंतरच स्पेस स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरुवात करते.
अंतराळवीरांची भूमिका का महत्त्वाची असते?
स्पेस स्टेशन उभारताना अंतराळवीरांना अनेक वेळा स्पेसवॉक करावे लागतात. बाहेरील उपकरणे बसवणे, सौर पॅनेल जोडणे, तांत्रिक दुरुस्ती करणे आणि नवीन मॉड्यूल्स जोडणे अशी महत्त्वाची कामे ते विशेष स्पेससूट घालून पार पाडतात. यासाठी त्यांना अनेक वर्षांचे कठोर प्रशिक्षण दिले जाते.
स्पेस स्टेशन पृथ्वीपासून किती दूर असते?
बहुतेक स्पेस स्टेशन पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर उंचीवर लो अर्थ ऑर्बिट (Low Earth Orbit) मध्ये फिरतात. या उंचीवरून ते दर ९० मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यामुळे एका दिवसात सुमारे १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची संधी अंतराळवीरांना मिळते.
स्पेस स्टेशन उभारण्यासाठी किती वर्षे लागतात?
इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी अनेक वर्षांचे नियोजन आणि मोठी आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) तयार होण्यासाठी दशकाहून अधिक कालावधी लागला. विविध देशांनी एकत्रितपणे त्याची उभारणी केली आणि टप्प्याटप्प्याने त्यात नवीन मॉड्यूल्स जोडत त्याचा विस्तार केला.
भारताचे स्पेस स्टेशनही अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने विकसित केले जाण्याची शक्यता आहे.
स्पेस स्टेशनमध्ये कोणत्या सुविधा असतात?
स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांच्या निवासासाठी स्वतंत्र विभाग, वैज्ञानिक प्रयोगशाळा, अन्नसाठा, व्यायामासाठी उपकरणे, संप्रेषण प्रणाली, जीवनरक्षक यंत्रणा आणि संगणकीय नियंत्रण प्रणाली असते. दीर्घकाळ अंतराळात राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या स्थानकात उपलब्ध करून दिल्या जातात.
वीजपुरवठा कसा केला जातो?
स्पेस स्टेशनवर मोठ्या आकाराचे सौर पॅनेल बसवलेले असतात. सूर्यप्रकाशातून निर्माण होणारी ऊर्जा विद्युत शक्तीत रूपांतरित केली जाते आणि त्याद्वारे संपूर्ण स्थानकातील उपकरणे कार्यरत राहतात. सूर्यप्रकाश उपलब्ध नसताना बॅटरीद्वारे वीजपुरवठा केला जातो.
भारतासाठी स्पेस स्टेशनचे महत्त्व काय?
स्वतःचे स्पेस स्टेशन उभारल्यास भारताला अंतराळ संशोधनात स्वतंत्रपणे मोठे प्रयोग करता येतील. गगनयानसारख्या मानवी अंतराळ मोहिमांना याचा मोठा फायदा होईल. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण आणि भविष्यातील चंद्र व मंगळ मोहिमांसाठीही हे स्थानक महत्त्वाची भूमिका बजावेल. २०३५ पर्यंत भारतीय स्पेस स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास भारत अंतराळ संशोधनात जगातील मोजक्या अग्रगण्य देशांच्या यादीत आणखी भक्कम स्थान मिळवू शकतो.










