नवी दिल्ली :
इंडिगो एअरलाईन्सच्या अनेक फ्लाईट रद्द झाल्यामुळं दिल्ली विमानतळासह देशातील विविध विमानतळावर हजारो प्रवासी पर्यटक अडकले आहेत. या संकटातून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी भारतीय रेल्वेनं विशेष गाड्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. उत्तर रेल्वेनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नवी दिल्ली, आनंद विहार, हजरत निजामुद्दीन, जुनी दिल्ली आणि दिल्ली सराई रोहिल्ला स्थानकांवरून बिहार, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यासारख्या देशातील अनेक राज्यांसाठी मर्यादित कालावधीच्या 20 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
इतर विमान एअरलाईन्सच्या तिकिटांचे दर वाढले :
इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट रद्द झाल्यानंतर जगभरातून दिल्लीत येणारे प्रवासी गंतव्य स्थानावार अद्याप पोहोचले नाहीत. इंडिगो एअरलाईनची फ्लाईट रद्द झाल्यामुळं प्रवाशांना इतर एअरलाईन्सनं प्रवास करण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतर विमान एअरलाईन्सच्या तिकिटांचे दर चार ते पाच पटींनी वाढले. यामुळं प्रवाशांवर आर्थिक भार पडला.
शुक्रवारी रात्रीपासून विशेष गाड्या सुरु :
“दिल्लीहून अनेक राज्यांमध्ये विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. जास्तीत जास्त प्रवाशांना दिलासा देण्यासाठी नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त डबेही जोडण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून विशेष गाड्या सुरू आहेत,” असं उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितलं.
प्रवाशांना प्रवास देणं हे प्राधान्य :
इंडिगो एअरलाईन्सच्या अनेक फ्लाईट रद्द झाल्यामुळं प्रभावित झालेल्या प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि परवडणारे प्रवास पर्याय प्रदान करणं हे याला आमचं प्राधान्य आहे. वास्तविक रेल्वे वेळापत्रक आणि सीट उपलब्धता NTES आणि IRCTC वर अपडेट करण्यात आली आहे. ज्यामुळं प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचं नियोजन कोणत्याही अडचणीशिवाय करता येईल, असं उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितलं.












