Indore Contaminated Water : देशातील सर्वात स्वच्छ शहर मानल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाणी पिऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि 40 हून अधिक जण आजारी पडले आहेत. विषारी पाण्यामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, इंदूरच्या भागीरथपुरा परिसरातील संजीवनी क्लिनिकमध्ये शेकडो रुग्ण उलट्या आणि अतिसाराने ग्रस्त आहेत.
तीन मृत्यूंची अधिकृत पुष्टी :
दूषित पाणी पिऊन लोकांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागल्याने इंदूरच्या भागीरथपुरा भागात घबराट पसरली. सरकारने आतापर्यंत तीन मृत्यूंची अधिकृत पुष्टी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत झोनल अधिकारी आणि सहाय्यक अभियंत्याला निलंबित केले आहे. तिसऱ्या उपअभियंत्याच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. सध्या अंदाजे 40 लोक आजारी आहेत, तर 1000 हून अधिक जणांवर उपचार करण्यात आले आहेत. (Indore Contaminated Water)
नर्मदा पाईपलाईन गळती :
भगीरथपुरा परिसरात नर्मदा पाईपलाईनमध्ये गळती झाल्याचे वृत्त आहे, जे शौचालयाच्या पाण्यात मिसळले आणि दूषित पाणी लोकांच्या घरात पोहोचले. हे पाणी पिल्यानंतर लोक आजारी पडू लागले. दरम्यान, घरोघरी जाऊन आजारी लोकांना ओळखण्यासाठी डझनभर अंगणवाडी महिलांना तैनात करण्यात आले आहे.
लोक अनेक दिवसांपासून करत होते तक्रार :
खरं तर, परिसरातील रहिवासी अनेक दिवसांपासुन नळांमधून घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार करत होते, परंतु वेळीच कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, 24 डिसेंबरपासून उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी झपाट्याने वाढू लागल्या आणि परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर गेली.
पाइपलाइनच्या वर सार्वजनिक शौचालय :
महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासात गंभीर निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. भागीरथपुराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या अगदी वर एक सार्वजनिक शौचालय आहे. मुख्य पाईपलाईनमधील गळतीमुळे ड्रेनेज थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये वाहू लागला. शिवाय, परिसरातील अनेक ठिकाणी तुटलेल्या पाणी वितरण लाईन्स आढळून आल्या, ज्यामुळे घरांमध्ये घाण पाणी शिरत होते. चार महिन्यांपूर्वी नवीन पाईपलाईन बसवण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. मुख्य पाईपलाईनची निविदा, ज्याची किंमत ₹2.5 कोटी होती, ती दुर्लक्षित करण्यात आली.








