Manish Sisodia | आज दिल्लीतील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात (Delhi Liquor Policy Case) राउज एवेन्यू कोर्टानं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा दिला आहे. कोर्टानं अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्या दोघांनाही कोर्टानं क्लीन चीट दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर मनीष सिसोदिया यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – दारू घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता! कोर्टाच्या निकालानंतर अरविंद केजरीवालांना अश्रू अनावर
निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काय म्हणाले मनीष सिसोदिया?
कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “आज आम्हाला पुन्हा एकदा आमच्या संविधानाचा अभिमान वाटतो. तसेच आम्हाला असे संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अभिमान वाटतो. आज पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला आहे”, असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल भावूक
कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल भावूक झाले होते. “माझ्याविरोधातलं हे प्रकरण खोटं होतं. आमच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरूंगात टाकण्यात आलं. सोबत एका विद्यमान मुख्यमंत्र्याला त्याच्या घरात जाऊन अटक करून तुरूंगात टाकलं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांनी मिळून सर्वात मोठा कट रचला होता”, असा आरोप केजरीवालांनी केला आहे.
दरम्यान, दारू घोटाळा प्रकरणाचा निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, कोर्ट कोणत्याही आरोपांवर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा त्याच्यासोबत भक्कम असा पुरावा असेल. नुसता दावा करून चालणार नाही पर्याप्त पुरावा असायला हवा. तसेच तपास यंत्रणेने दिलेले पुरावे हे अपर्याप्त आणि कमजोर आहेत, असं कोर्टाने स्पष्ट केलं.












