Maharashtra Vidhan Bhavan Bomb Threat | नुकतीच महाराष्ट्राला (Maharashtra) हादरवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे विधानभवन (Maharashtra Vidhan Bhavan) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून विधानभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच सध्या विधानभवनाच्या परिसरामध्ये बॉम्ब शोध पथकाचे श्वान पथक दाखल झाले आहेत. सध्या या घटनेबाबत कसून तपास केला जात आहे.
हेही वाचा – थरारक घटना! फारूख अब्दुल्ला यांच्यावर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला, गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल
ई-मेलद्वारे विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी
विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी या घटनेबाबत तपास सुरू केला असून शोध मोहीम सुरू केली आहे. एकिकडे विधानसभेत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या परिसरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेतेमंडळी येत असतात. अशातच आता विधानभवन बॉम्ब उडवून देण्याची धमकी दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
भल्या पहाटे ई-मेलद्वारे विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाले आहेत. तसेच विधानभवन परिसरातून सर्व कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांवा बाहेर काढण्यात येत आहेत. सोबतच प्रत्येक केबिनची चेकींग केली जात आहे. भवनात कुठे संशयास्पद गोष्टी आढळतात का, याचा तपास घेतला आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर विधानसभा अध्यक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या विधानभवन परिसरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
विधानभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. तर सर्च ऑपरेशन होईपर्यंत कोणालाही आत सोडले जाणार नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या धक्कादायक प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा संपूर्ण तपास केल्याशिवाय अधिवेशन चालवू नका. ही धमकी फक्त भिती दाखवण्यासाठी दिली आहे की यामागे काही दडलं आहे हे तपासलं पाहिजे. कारण फारूख अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न होतो तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानभवन बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जाते, त्यामुळे या प्रकरणाचा कसून तपास केला पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.












