भंडारा: नितीन कुथे
Forest Land at Risk : ‘तलावांचा जिल्हा’ (District of Lakes) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा (bhandara) जिल्ह्यासाठी यंदाचा उन्हाळा केवळ उष्णता नव्हे, तर वनांच्या अस्तित्वाचे मोठे संकट घेऊन आला आहे. जागतिक वन दिनाचे (World Forestry Day) औचित्य साधत जिल्हयातील वनसंपदेच्या सुरक्षेचा आणि शाश्वत विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात सध्या १२,५८७ हेक्टर वनक्षेत्र वणवा (Wildfire), शिकारी (Hunter) आणि मानव-वनजीव संघर्ष या तिहेरी विळख्यात अडकले आहे.
एका वर्षात ६,४१७ हानीची प्रकरणे
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यात हानीची तब्बल ६,४१७ प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये ३ व्यक्तींचा मृत्यू, ४२ जखमी आणि ८१४ पशुधनांच्या मृत्यूचा समावेश आहे. या नुकसानीपोटी शासनाला ७ कोटी ३३ लाख ७६ हजार ४५१ रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे. ही आकडेवारी ग्रामीण भागातील विस्कळीत झालेल्या जनजीवनाचे वास्तव मांडणारी आहे.
‘वणवा’ ठरतोय सर्वात मोठा शत्रू
मार्च ते जून हा काळ वनविभागासाठी अत्यंत परीक्षेचा असतो. मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलनाच्या काळात जंगलात लागणारा वणवा संपूर्ण जैवविविधता भस्मसात करतो. मोहाची फुले (Mahua Flowers) वेचण्यासाठी झाडांखालील पालापाचोळा जाळण्याची जुनी पद्धत वणव्याला निमंत्रण देत आहे. वणव्यामुळे केवळ झाडेच जळत नाहीत, तर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला तेंदूपत्ताही जळून खाक होतो, ज्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडतो.
मानव-वन्यजीव संघर्षाची दाहकता
कोका आणि उमरेड-पवनी-करांडला अभयारण्य (Koka and Umred-Pauni-Karhandla Wildlife Sanctuary) यामुळे जिल्ह्यात वाघ, बिबट्या आणि नीलगायींची संख्या वाढली आहे. मात्र, जंगलाचे क्षेत्र आकुंचन पावत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत. साकोली परिक्षेत्रातील बांपेवाडा येथे मोहफुले वेचताना वाघाच्या हल्ल्यात झालेला वसंत मेश्राम यांचा मृत्यू ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
शिकाऱ्यांचा वाढता उपद्रव
जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात बाहेर येतात. याच संधीचा फायदा शिकारी घेतात. पानवठ्यांच्या ठिकाणी सापळे रचणे किंवा विजेचा प्रवाह सोडून प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. वनविभागाने ‘ट्रॅप कॅमेरे’ लावले असले तरी, विशाल वनक्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आजही भासत आहे.







