Maharashtra Rain Forecast: उन्हाचा चटका यंदा अधिक तीव्र जाणवत असून पावसाचे आगमन कधी होणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता वाढली आहे. उकाड्यामुळे त्रस्त झालेला महाराष्ट्र आता पावसाच्या सरी आणि मेघगर्जनेची आतुरतेने वाट पाहत आहे. हवामान विभागाने यासंदर्भात नेमका काय अंदाज वर्तवला आहे, ते पाहूया.
जून महिना सुरू होऊन १५ दिवस झाले तरी उन्हाचा झळा अजून तीव्र जाणवत असून पावसाचे आगमन कधी होणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता वाढली आहे. कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचलेला नैऋत्य मान्सून पुढे सरकण्यासाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती अद्याप अनुकूल नसल्याचे त्याची प्रगती मंदावली आहे. परिणामी मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा कायम असून नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता असून त्यानंतर मान्सूनला गती मिळू शकते. सध्या राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान उच्च पातळीवर कायम असल्याने उष्णतेचा त्रास वाढला आहे.
हेही वाचा: लाडकी बहीण योजनेत मोठा झटका! हजारो महिलांचा लाभ धोक्यात…
एल निनोचा मान्सूनवर परिणाम
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील एल निनो परिस्थिती यंदा अधिक प्रभावी ठरत आहे. या वातावरणीय घटनेचा परिणाम जगभरातील हवामान पद्धतींवर होत असून भारतातील मान्सूनलाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोमुळे पावसाचा वेग आणि वितरण दोन्ही प्रभावित होऊ शकतात.
भारतीय हवामान विभागानेही एल निनो सक्रिय असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे यंदा काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी क्षेत्रासाठी ही बाब महत्वाची मानली जात असून शेतकऱ्यांचे लक्ष आगामी पावसाकडे लागले आहे.
मुंबई, पुणे आणि राज्यात पाऊस कधी?
सध्या मान्सूनची वाटचाल कोकण किनारपट्टीत मर्यादित राहिली आहे. वातावरणातील कोरडे आणि उष्ण वारे कमी झाल्यानंतरच मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होईल, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. त्यानुसार, मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचे आगमन जूनच्या तिसऱ्या आठवडण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी आणि अर्थव्यवस्थेची चिंता वाढली
भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग मान्सूनवर अवलंबून असल्याने पावसातील विलंबाकडे गंभीरतेने पहिले जात आहे. पावसाचे असमान वितरण, काही भागांत कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टी, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम शेती उत्पादन, जलसाठे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.




