सातारा : महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा, कोकण, सातारा जिल्ह्यातील पूर्वभागात तसेच एकंदरीत संपूर्ण देशात वरुणराजाने हाहाकार माजवला आहे. पूरबाधितांच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दि. 2 ऑक्टोबर 25 रोजीचा सातारचा विजयदशमी सिमोल्लंघन सोहळा अतिशय साधेषणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
शासनाचा यावर्षीचा निधी पूरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा, तसेच जनता जनार्दनानेही माणुसकीच्या भावनेतून शक्य असेल ती मदत जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत मुख्यमंत्री पूरग्रस्त सहायता निधीमध्ये करावी, असे आवाहन त्यांनी केले.
उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशभरात आणि विशेषकरून महाराष्ट्र राज्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जीवित आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
बळीराजा शेतकरी तर उध्वस्त झाला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सातारचा “शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा” थाटामाटात, धुमधडाक्यात डामडौलात करणे हे किमान आमच्या मनाला पटणारे नाही.
पावसामुळे मराठवाड्याचा हाहाकार झालेल्या ठिकाणी मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकांनी एक भारतीय म्हणून पुरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी शक्य होईल तितकी आर्थिक किंवा वस्तू किंवा धान्य स्वरूपातील मदत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहायता निधीमध्ये जमा करावी, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केल आहे.