State Cold Wave Alert : केंद्रीय हवामानशास्त्र विभाग आणि महाराष्ट्रातील हवामान निरीक्षण यंत्रणांच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यासाठी किमान तापमानाचा ‘यलो अलर्ट‘ जारी करण्यात आला आहे. तर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पारा घसरणार असल्यामुळं गारठा या भागांमध्येसुद्धा जाणवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, असे काही जिल्हे आहेत जिथं पुढील दोन दिवस थंडीच थंडी पडणार आहे.
हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींचा थेट परिणाम मध्य भारतासह आता महाराष्ट्रावरही दिसत असून, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानाच लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. निफाड, धुळ्यासह नागपूर, जालना या भागांमध्ये किमान तापमान एकेरी आकड्यावर आल्यानं थंडीचा कडाका नागरिकांना गारठून ठेवण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरीकांनी काम असेल तर घराबाहेर पडलं तर त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं अन्यथा सर्दी, खोकला, थंडी-ताप यांसारखे आजार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – 2025 संपण्यापूर्वी हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय ? मग याठिकाणी जाण्याचा प्लॅन नक्कीच करा
राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारठा वाढण्याची शक्यता
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, गोंदिया, नागपूर इथं थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील घाट क्षेत्रातही घोंगावणाऱ्या शीतलहरी अडचणी निर्माण करताना दिसतील. या भागावर धुक्याचं साम्राज्य असून दृश्यमानतेवर त्याचा परिणाम होणार असल्यानं वाहतुकीदरम्यान सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Cold wave very likely to prevail in isolated pockets over Madhya Maharashtra and Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/1fimlGvJbF— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 10, 2025
कधी नव्हे ते मुंबईकरही या गुलाबी थंडीनं गारठत आहेत
मराठवाडा, विदर्भच नव्हे, तर मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघरमध्येसुद्धा किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रानुसार शहरातील रात्रीच्या तापमानाचा आकडा 17 ते 20 अंशांदरम्यान असून दुपारी 11 ते 12 पर्यंत हवेत हा हलका गारठा टिकून राहत आहे. पुन्हा दिवस मावळतीला गेल्यानंतर थंड वाऱ्यांचे झोत शहरात वाहत असल्यानं कधी नव्हे ते मुंबईकरही या गुलाबी थंडीनं गारठत आहेत.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला
काही दिवसांपूर्वी राज्यात थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा उत्तरेकडे शीतलहरी अधिक तीव्र झाल्यामुळं आणि नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय होत असल्यामुळं वारे महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला असल्याचं स्पष्ट होत आहे.













Comments are closed