Krantijyoti Vidyalaya Alumni Initiative : सध्या राज्यातील सर्व सिनेमागृहात मराठी शाळांवर आधारित असलेला ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. असे असतानाच या चित्रपटाची पुर्नरावृत्ती बीड जिल्ह्यातील केज शरहात होताना दिसून येत आहे. केज शहरातील शेकडो विद्यार्थी घडवलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आता शेवटच्या घटका मोजत आहे. अशा परिस्थितीत ३० ते ४० वर्षापूर्वी या शाळेत शिक्षण घेतलेल्या ६०० माजी विद्यार्थ्यांनी एकत्रयेत ही शाळा वाचवण्याचा विडा उचलला आहे.
हेही वाचा – युजीसीच्या नवीन कायद्यांमुळे विद्यार्थी रस्त्यावर, युपी, बिहार, राजस्थानमध्ये निषेधाचे पोस्टर्स
केजच्या या शाळेत केज, टाकळी, कदमवाडी, उमरी, कानडी माळी, साबला, धर्माळा, पिसेगाव, तांबवा, बोबडेवाडी, साळेगाव, या परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. आज हे सर्व माजी विद्यार्थी विविध विभागात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. मात्र आपण शिक्षण घेतलेली शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे समजताच हे सर्व विद्यार्थी ३० ते ४० वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आले. ही शाळा विद्यार्थी पटामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे.
शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन
प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) हे सर्व विद्यार्थी झेंडावंदन करण्यासाठी सकाळी ७:५० शाळेत उपस्थित राहिले. त्यानंतर केज शहरात विविध कार्यालयातील ध्वजारोहन कार्यमक्रमात झाल्यानंतर प्रभातफेरीत देखील हे विद्यार्थी सहभागी झाले. त्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नंतर शाळेची इमारत दुरुस्ती व पुनर्रचना, विद्यार्थी पट वाढवण्यासाठीच्या उपाययोजना संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सखोल चर्चा करण्यात आली. या शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी आज चांगल्या पदावर मंत्रालयात नोकरीला आहेत. या सर्वांनी शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी केज व परिसरातील शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यातील आणि देशातील ‘शिक्षणाचा बाजार
महाराष्ट्रात आज ‘मराठी भाषा’ अभिजात झाली, याचा अभिमान महाराष्ट्रात मिरवला जातो. मात्र, त्याच महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळा एकामागोमाग एक बंद पडत चालल्या आहेत. त्यावर बोट ठेवणारा, थेट प्रश्न विचारणारा आणि अंतर्मुख करणारा सिनेमा म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ आहे. हा सिनेमा केवळ कथा नाही, तर सामाजिक वास्तव दाखवणारा आरसा आहे. सध्या राज्यातील आणि देशातील ‘शिक्षणाचा बाजार झाला आहे’. ‘मराठी भाषा अभिजात झाली; पण मराठी शाळा अभिजात कधी होणार?’ हे केवळ सिनेमातील संवाद नाहीत, तर आजच्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक वास्तवावर केलेली दुखरी टिप्पणी आहे. प्रशासन, राज्य सरकार, पालक आणि समाज एकमेकांकडे बोट दाखवत असताना मराठी माध्यमाच्या शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या थेट मनाला हात घालतो. त्याचीच पुर्नरावृत्ती सध्या केजमध्ये झाली आहे.












