मुंबई : मुंबई मध्ये स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6 मार्गिकेचे काम सुरु आहे. परंतु सुयोग्य नियोजन नसल्याने या मार्गिकेवरील खांब जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. तर परिसरातील काही मेट्रोचे खांब पाडण्याची नामुष्की एमएमआरडीए वर ओढावली आहे.
अचानक बदलांमुळे, कांजुरमार्ग परिसरात उभारण्यात आलेले काही मेट्रोचे खांब पाडण्याची नामुष्की आता एमएमआरडीएवर ओढवली आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6 मार्गिकेच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. कारशेडच्या लेआऊट प्लॅन मध्ये झालेल्या बदलांमुळे, कांजुरमार्ग या परिसरात उभारण्यात आलेले मेट्रोचे खांब पाडण्यात आले आहे. सुयोग्य नियोजन नसल्याने ही नामुष्की ओढवली असून या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वाया गेल्याचे उघड झाले आहे.एमएमआरडीए ने मेट्रो ६ मार्गिकेच्या लेआऊट मध्ये अचानक बदल करण्याचा निर्णय घेतला. या अचानक झालेल्या बदलामुळे, बांधण्यात आलेल्या खांबांच्या उभारणीसाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेला आहे. हि मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार होती. परंतु या महत्त्वाच्या मार्गाच्या कामातील निष्काळजीपणामुळे या प्रकल्पाच्या वेळेवरही परिणाम दिसून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कांजुरमार्ग येथे सुरु असलेल्या १५.३१ किलोमीटर लांबीच्या आणि १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मेट्रो 6 मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए यांच्याकडून करण्यात येत आहे. ही मार्गिका मार्च २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आतापर्यंत मार्गिकेचे ९० टक्के बांधकाम (सिव्हिल वर्क) पूर्ण झाले आहे. तर अंतिम टप्प्यातील काम १० टक्के सुरू आहे. परंतु याच प्रकल्पातील कारशेडचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. कारण कारशेडसाठीच्या जागेचा वाद सुरु आहे. हा वाद अजूनही सुटलेला नसताना आता मार्गिकेच्या लेआऊटमध्ये बदल केल्यामुळे आतापर्यंत झालेला खर्च पाहता एमएमआरडीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यामुळे आता 2027 मध्ये होणारे मेट्रोचे काम लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे. यामुळे आता कामाची गती आणि खर्च संपूर्ण नियोजनशून्यतेमुळे झाल्याचे बोलले जात आहे.






