महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार थांबायचं नाव घेत नाही. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात अद्याप पूरसदृश्य परिस्थिती कायम असून पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुण्यात पुढील 48 तास अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच पुण्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तास धोक्याचे
आज 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबरला पुण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 28 सप्टेंबरला रेड अलर्ट तर 29 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील 48 तास धोक्याचे असून पुणेकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे.
खडकवासला धरणातील विसर्ग वाढवला
27 सप्टेंबरच्या रात्रीपासूनच पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्ग वाढवण्यात आला असून घाटमाथ्यावर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती आहे. खडकवासला धरणातून रात्री 9 वाजल्यापासून 6 हजार 864 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्ग वाढवण्याची शक्यता पाट बंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
पावसाचा जोर कमी न होण्याची शक्यता कायम
मिळालेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत राज्यात ढगांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अतिवृष्टीचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात दिसू शकतो. याशिवाय 5 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा तडाखा बसल्याची, माहिती हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नसल्याची, माहिती आहे.
संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संबधित जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक-
धाराशीव ०२४७२-२२७३०१, बीड-०२४४२-२९९२९९, परभणी- ०२४५२-२२६४००, लातूर – ०२३८२- २२०२०४, रत्नागिरी- ७०५७२२२३३, सिंधुदुर्ग-०२३६२- २२८८४७, पुणे- ९३७०९६००६१,सोलापूर- ०२१७-२७३१०१२, अहिल्यानगर ०२४१-२३२३८४४, नांदेड-०२४६२-२३५०७७, रायगड- ८२७५१५२३६३, पालघर- ०२५२५- २९७४७४, ठाणे- ९३७२३३८८२७, सातारा- ०२१६२- २३२३४९, मुंबई शहर आणि उपनगर- १९१६/०२२- ६९४०३३४४.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 अधिकारी/कर्मचारी उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांक:- ०२२-२२०२७९९०,०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.