ajit pawar accident supriya sule speech : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या निधनाला दोन महिने उलटले आहेत. परंतु तपास अद्याप कोणत्याही तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी लोकसभेत केला. या प्रकरणातील तपासाच्या संथ गतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनावर निशाणा साधला. शुक्रवारी संसदेच्या शून्य प्रहरात हा संवेदनशील मुद्दा उपस्थित करताना, सुळे यांनी येणाऱ्या अडथळ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?
रोहित पवारांना एफआयआरसाठी करावा लागतोय संघर्ष
सुप्रिया सुळे यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांचा विशेष उल्लेख केला. त्या भावूक आणि कठोर स्वरात म्हणाल्या की, “एका शक्तिशाली राजकीय कुटुंबातील सदस्य असूनही रोहित पवार यांना या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागत असेल, तर सामान्य माणसाची अवस्था काय होत असेल? सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी किती अडचणींना सामोरे जावे लागत असेल, याची कल्पनाच केलेली बरी.”
काय आहे प्रकरण?
२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली होती. अजित पवार मुंबईहून बारामतीला प्रवासासाठी निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर नागरी विमान वाहतूक सुरक्षेबाबतही (Aviation Safety) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
लोकसभेत पडसाद
सुप्रिया सुळे यांच्या या भाषणानंतर सभागृहात शांतता पसरली होती. विमान अपघाताच्या तांत्रिक तपासाचा अहवाल अद्याप का समोर आला नाही आणि एफआयआर नोंदवण्यास विलंब का होत आहे, यावरून आता राज्य आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.












