Baramati Rahuri by election Congress : राज्यात एखाद्या नेत्यांचं निधन झाल्यानंतर तिथली पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती, मात्र बदलत्या राजकारणात आता महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मनाचं हे मोठेपण उरलंय का? असा सवाल उपस्थित होतोय, कारण आता जरी भाजपा आणि राष्ट्रवादी ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा व्यक्त करत असले तरी. ही संस्कृती मोडण्याचं काम भाजपानं पहिल्यांदा पंढरपुरात केलं, कारण भारत नाना भालकेंच्या निधनानंतर भाजपानं तिथं समाधान आवतडे यांना मैदानात उतरवलं आणि ही निवडणूक चुरशीची करून जिंकली.
पोटनिवडणुकीत बिनविरोध होईल, हे विसरून जा
त्यामुळेच आता बाकीच्यांना दोष देऊन काय फायदा असं महायुतीचं झालंय, कारण बारामती आणि राहुरीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत ही निवडणूक बिनविरोध होईल, हे विसरून जायला हरकत नाही. कारण आता सामना चुरीचा होणार असं दिसतंय, महायुतीला काँग्रेसनं दिलेलं तडाखेबंद आव्हान त्याला कारण ठरतंय. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढवणारच असा पवित्रा आता काँग्रेसनं घेतलाय. त्यासाठी मुलाखतींचा टप्पा पूर्ण केल्याचीही माहिती मिळतेय.
काँग्रेसकडून दोन्ही जागांवर ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजले असून बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमात आता काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. महायुतीकडून या निवडणुका बिनविरोध करण्याचे वारंवार आवाहन केले जात असताना, काँग्रेसने मात्र दोन्ही जागांवर ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या आहेत.
लोकशाहीत निवडणुका होणे गरजेचं, जनतेला पर्याय देणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य
राज्यातील राजकीय संस्कृतीचा हवाला देत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती महाविकास आघाडीला केली होती. विशेषतः बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा विचार करून महायुतीने सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले की, “लोकशाहीत निवडणुका होणे गरजेचे आहे आणि जनतेला पर्याय देणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य आहे.” यामुळे आता बारामती आणि राहुरीत चुरशीची लढत होणार हे निश्चित झाले आहे.
दोन्ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या ऑनलाइन मुलाखती
काँग्रेस पक्षाने गुरुवारी, २ एप्रिल २०२६ रोजी बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमधून स्थानिक पातळीवरील तीन ते चार प्रभावी नेत्यांनी आपली दावेदारी मांडली आहे, तर राहुरीतून जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवली आहे. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने या दोन्ही जागा लढवण्यासाठी प्रदेश शाखेला हिरवा कंदील दिला असून, उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा ६ एप्रिलच्या आधी केली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने पुढाकार घेत ही जागा लढवण्याचा निर्णय
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीतून उमेदवार न देण्याचे संकेत दिले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने पुढाकार घेत ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने केवळ स्वतःच्या ताकदीवरच नव्हे, तर मित्रपक्षांनाही सोबत घेण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी या पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. रासपचे नेते महादेव जानकर यांचीही मदत काँग्रेस घेणार असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही काँग्रेसच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत प्रचारात सक्रिय सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.
बारामती हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा गड
बारामती हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा गड मानला जातो. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसने येथे उमेदवार दिल्यास ही लढत आता दुहेरी न राहता ‘काँग्रेस विरुद्ध महायुती’ अशी थेट होणार आहे.
राहुरीमध्ये शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व
तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. येथे काँग्रेसचे जुने जाळे असून, शेतकरी प्रश्नांवरून भाजपला घेरण्याची काँग्रेसची रणनीती आहे.
राज्यातील बदललेले राजकीय वारं बघता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला
गेल्या काही काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील बदललेले राजकीय वारं बघता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी किती मजबूत आहे, हे तपासण्याची ही मोठी संधी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जर काँग्रेसने या निवडणुकीत चांगली मते घेतली, तर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई
एकूणच, बारामती आणि राहुरीची ही पोटनिवडणूक केवळ दोन जागांचा विषय नसून, ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. आता काँग्रेस कोणाला उमेदवारी देते आणि प्रत्यक्ष प्रचारात कोणते मुद्दे गाजतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच या निवडणुकीत फक्त सहानुभूतीची लाट प्रभावी ठरते, की आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळतो, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बारामतीत तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही दंड थोपटले
हे झालं काँग्रेसचं मात्र तिकडे बारामतीत तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीसाठी धनगर मतांचं गणित हे लक्षवेधी ठरणार आहे. कारण बारामतीत धनगर मतंच गेमचेंजर ठरतात. अजितदादा हयात असतानाची गोष्ट वेगळी होती. धनगर मतंही एकमुठीनं अजित पवारांना साथ देत होती. मात्र तीच साथ आता सुनेत्रा पवारांना मिळणार का? की आणखी काही वेगळं समीकरण दिसणार? हे सांगणारीही ही निवडणूक आहे. शिवाय बारामतीतून पहिली खासदारकीची निवडणूक हरल्यानंतर सुनेत्रा पवार या आता दुसऱ्यांदा थेट लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवतायत त्यामुळे त्यांचा जनाधारही या निवडणुकीत टेस्ट होणार आहे…










