पूर्वीचा महाराष्ट्र आणि आजच्या महाराष्ट्रात खूप तफावत जाणवत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, भाषावाद आजच्या महाराष्ट्रासाठी जणू शापच बनलेला आहे. कुणी हिंदी भाषेच्या वादावरून लढत आहे ; तर कुणी मराठी बोलत नाही म्हणून चर्चेला तोंड फोडत आहे. सर्वगुणसंपन्नाने नटलेल्या या महाराष्ट्रात जर असेच चालत राहिले तर एक दिवस ह्या महाराष्ट्रात माणसांची ओळख ही बंधूभावाने नाही तर भाषावाराने होणे नक्कीच आहे. ज्या महाराष्ट्राचा इतिहास लोकांना माणुसकीची शिकवण देतो, जो महाराष्ट्र साहित्य, शौर्य आणि संस्कृतीची ओळख देतो अश्या ठिकाणी भाषावादाचं सावट पसरायला नकोच हवे.
महाराष्ट्राने आजवर अनेक महापुरुष, विचारवंत, साहित्यिक ह्यांचा वारसा जपला आहे आणि तो पुढेही तसाच जपला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम अश्या अनेक महान पुरुषांनी महाराष्ट्र्राला एकत्रित ठेवण्याचे काम केले. परंतू आजच्या ह्या भाषेच्या वादावरुन एकढेच जाणवत आहे की, भाषा मतभेदाने वाढलेल्या राजकारणाने समाजात असलेला द्वेष आणखीनंच वाढत चालला आहे. अशीच परिस्थिती जर आपल्या महाराष्ट्रात राहिली तर माणूसकी कमी आणि भाषावाद जास्त वाढून लोकांची असलेली मानसिकता आणि गुण्यागोविंदाने जपलेली एकात्मकतेची भावना आपण लवकरच गमावून बसू ह्यात काही शंकाच नाही.
मराठी-अमराठी वाद हा आता शिगेच्या अंतिम टोकाला पोहचला असून सध्याच्या वातावरणात राज्यात वाढत चाललेला भाषावाद हा चिंतेचा विषय बनत आहे. ज्या हिंदीला आपण लहानपणापासून आपली राष्ट्रभाषा स्वीकारून तिची आजतागायत बोली प्रेमाने बोलत आहोत; आज त्याच हिंदी भाषेविरोधी भावना ह्या सगळीकडे आपणास पाहायला मिळत आहे. मग ते सोशल मीडियावरील मतभेद असो किंवा भाषेच्या आधारे केले गेलेले राजकारण हे सामाजिक सलोख्याला बाधा आणत आहे. ह्या परिस्थितीवर जर कुठलाच तोडगा निघाला नाही तर एकतेच्या भावनेला क्षीण लागायला वेळ लागणार नाही; आणि माणुसकीपेक्षा भाषाचं आज श्रेष्ठ होईल.
महत्वाचे म्हणजे, आज मराठी शाळा बंद पडण्याचे कारण हे इंग्रजी आणि हिंदी भाषेला कारणीभूत ठरवता येऊ शकते. आजची तरुणाई जी जास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असते; जर तिनेच समजूतदारपणा घेत हा विषय मनावर घेतला तर संवादाचे एक नवीन माध्यम तयार होऊन भाषावादावर एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. परंतू इतके सर्व होताना जितके प्रेम आपण इंग्रजी आणि हिंदी भाषेवर दाखवत आहोत; तितकेच प्रेम आपण राहत असलेल्या महाराष्ट्रात मराठीसाठी दाखवले तर आपली संस्कृती आपल्याला जपता येईल. तर आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतांना आपण दुसऱ्या भाषेचाही तितकाच सन्मान आपल्याला करता आला पाहिजे.
चालू असलेल्या भाषेच्या वादावर जर आपण असेच भांडत राहिलो तर संविधानासारख्या महाकाव्याचं अपमान होणे निश्चित आहे. आता तरी आपण ओळखायला शिकले पाहिजे की, कुठलीही भाषा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी असते तर ओळख ठरवण्यासाठी नसते. तर भाषेवरून माणसांची किंमत ठरवण्याची मानसिकता ही समाजाला खिळा ठरत असते. रोजच्या दिसत असलेल्या बड्या नेत्यांकडून राजकीय स्वार्थासाठी भाषेचा वापर केला जातोय; तर तो फक्त निवडणुकीसाठी. अशा वेळी सामान्य नागरिकांनी सजग राहून समाजात भेद न पसरू देणेचं गरजेचे असते. आपण पाहत असलेल्या अनेक चित्रपट, वेब सिरीज, नाटकं, जाहिरातींमध्ये आपल्या मराठीला कायमच दुय्यम स्थान दिलं जातं. परंतु भाषाविषयी अभिमान बाळगण्यासाठी आपणच आपल्या संस्कृतीला प्राधान्य जास्त द्यायला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘मराठी संस्कृतीचे रक्षण’ देखील होईल आणि सर्व भाषांचा सन्मान राखून, सामाजिक समतेसोबत भाषावाराची परिभाषाही बदलून जाईल.