Samarjit Ghatge returns to BJP : निष्ठा की राजकीय सोय? विचारसरणी की सत्तेचं गणित? कोल्हापूरच्या राजकारणात (Kolhapur Politics) पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. भाजप सोडून शरद पवारांचा हात धरलेले समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) आले, लढले, हरले… आणि आता पुन्हा भाजपात परतले…त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश (Joining the BJP) करत ‘घरवापसी’ केली आहे, पण हा फक्त पक्षप्रवेश आहे का… की बदलत्या राजकारणाचं मोठं चित्र? या प्रवासामागचं राजकारण काय आणि यामुळे कागलसह कोल्हापूरच्या राजकारणाची समीकरणं (The political equation) कशी बदलणार? हे या लेखातून पाहू…
हेही वाचा – पक्ष स्थापना दिनी नितीन गडकरींचा सूचक वार; म्हणाले, “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”
समरजीत घाटगे हे एक प्रभावशाली नाव राहिलंय
पश्चिम महाराष्ट्रातील कागलच्या राजकारणात समरजीत घाटगे हे एक प्रभावशाली नाव राहिलं आहे. ऐतिहासिक घाटगे घराण्याचे वारसदार, आणि सहकार-शिक्षण क्षेत्रात मजबूत पकड—यामुळे त्यांचा प्रभाव केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. त्यांचे वडील स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी उभारलेला वारसा त्यांनी पुढे नेला. शाहू साखर कारखाना, शिक्षण संस्था आणि स्थानिक नेटवर्क यामुळे घाटगे यांचं स्वतःचं एक स्वतंत्र राजकीय वजन तयार झालं आहे.
निवडणुकीच्या तोंडावर समीकरणं बदलली
२०१६ मध्ये समरजीत घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समीकरणं बदलली. महायुतीत हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कागलमध्ये त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली… पण या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. याच पराभवानंतर घाटगे यांची पुढील दिशा काय असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे पुन्हा एकत्र
राजकारणात कायमस्वरूपी मित्र-शत्रू नसतात, हे पुन्हा एकदा कागलमध्ये दिसून आलं. नगरपालिका निवडणुकीत एकेकाळचे प्रतिस्पर्धी असलेले हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे पुन्हा एकत्र आले. या आघाडीने कागल नगरपरिषदेत 23 पैकी 23 जागा जिंकत विरोधकांच् ‘व्हाईट वॉश’ केला. मात्र मुरगुडमध्ये त्याच आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. यातून स्पष्ट झालं की स्थानिक पातळीवर मतदार अजूनही व्यक्ती आणि कामावर मत देतात… फक्त आघाडीवर नाही.
राष्ट्रवादीत घाटगेंना अपेक्षित राजकीय स्थान मिळालं नाही
आता सर्वात मोठा प्रश्न की समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये का आले?…याचं सगळ्यात पहिलं कारण समजलं जातंय ते म्हणजे राजकीय स्थैर्य…शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर घाटगेंना अपेक्षित राजकीय स्थान मिळालं नाही…त्यांच्या निर्णय स्वातंत्र्यावरही दगा येत असल्याचं बोललं जात होतं… दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सत्तेचं समीकरण… राज्यात भाजप सत्तेत असल्याने भविष्यातील राजकीय संधी घाटगेंना खुणावत होत्या…कारण स्वतः घाटगे यांनी स्पष्टपणे सांगितलं की फडणवीस हे माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. माझं राजकीय भवितव्य त्यांच्या हाती आहे. कागलमध्ये महायुतीत राहूनच पुढे जाणं हा व्यवहार्य पर्याय असल्याचं घाटगे यांनी ओळखलं. पक्ष सोडण्याआधी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि आपला निर्णय कळवला. पवारांची परवानगी घेऊनच पक्ष सोडला असं घाटगेंनी सांगितलं.
रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
घाटगे यांच्या घरवापसीमुळे भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठा फायदा होऊ शकतो अशी परिस्थीती आहेच कारण याची झलक घाटगेंना गेल्या नगरपालिका निवडणूकांमधून दाखवली होती. आगामी २०२९ विधानसभा निवडणुकांसाठी भाजपला कोल्हापूरात मजबूत तयारी करण्यासाठी भाजपलाही घाटगेंची गरज होती. त्यामुळे आज अखेर चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेला त्यांचा प्रवेश हा फक्त औपचारिक कार्यक्रम नव्हता—तर एक राजकीय रणनिती होती असं म्हणावं लागेल.












