मुंबई :
भारतीय क्रिकेट स्टार स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न 22 नोव्हेंबर रोजी होणार होतं. मात्र त्यादिवशी स्मृतीचे वडील अचानक आजारी पडले आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पलाशलाही नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळं लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर अंदाज बांधण्यास सुरुवात केली. आता, मंधानानं या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Twitter has changed the like ❤️ button to support Smriti mandhana
Tap to check ❤️
“Palash Muchhal” #SmritiMandhana pic.twitter.com/LGsumNTJSc
— VP (@veep72) December 7, 2025
काय म्हणाली स्मृती :
स्मृती मंधानानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यात लिहिलं आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल खूप अटकळ बांधली जात आहेत आणि मला वाटतं की सध्या माझ्यासाठी बोलणं महत्त्वाचं आहे. मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि मला ते असंच ठेवायचं आहे, परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की लग्न रद्द करण्यात आलं आहे. मी हे सर्व सोडून देऊ इच्छिते आणि मी सर्वांना तेच करण्याची विनंती करते.”
आता पुढे जाण्याची वेळ :
स्मृती मंधानानं पुढं लिहिलं, “मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सध्या दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला पुढं जाण्यासाठी वेळ द्या. माझं ध्येय नेहमीच माझ्या देशासाठी चांगलं काम करणं हे राहिलं आहे. मला आशा आहे की मी दीर्घकाळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकेन आणि हेच माझे नेहमीच लक्ष असेल. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढं जाण्याची वेळ आली आहे.”
भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये झळकावली 14 शतकं :
स्मृती मंधानाला भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानलं जातं आणि तिनं अनेक सामन्यांमध्ये एकटीनं भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. मंधानानं वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी एकूण 5322 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 14 शतकं आणि 34 अर्धशतकं आहेत. तिनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3982 धावा देखील केल्या आहेत. तिनं 7 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 629 धावा केल्या आहेत.












