T20 World Cup Controversy : आगामी टी-20 विश्वचषकावरुन भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक तणाव आता क्रिकेट क्षेत्रातही पसरला आहे. बांगलादेशनं अधिकृतपणे भारतात होणारे त्यांचे चार लीग सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सनं अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूचनेनुसार बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला सोडल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षा चिंता आणि मुस्तफिजूरचा मुद्दा :
बांगलादेश सरकारचे सल्लागार आसिफ नजरल यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला या संदर्भात आयसीसीला लेखी पत्र पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. नजरल यांचा असा युक्तिवाद आहे की जर एखाद्या प्रमुख बांगलादेशी खेळाडूला कराराखाली असूनही भारतात सुरक्षित वाटत नसेल किंवा त्याला खेळण्यापासून रोखण्यात आलं असेल, तर भारत दौऱ्यामुळं संपूर्ण राष्ट्रीय संघासाठी सुरक्षेची चिंता निर्माण होऊ शकते. केकेआरनं ₹9.20 कोटींना खरेदी केलेल्या मुस्तफिजूर रहमानला राजकीय परिस्थितीचा हवाला देत सोडण्यात आलं आहे, ज्यामुळं वाद आणखी वाढला आहे. (T20 World Cup Controversy)
बांगलादेशचं प्रस्तावित वेळापत्रक :
बांगलादेशचे चार महत्त्वाचे लीग सामने भारतातील दोन प्रमुख शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. वेळापत्रकानुसार, बांगलादेश त्यांचे पहिले तीन सामने कोलकाता इथं 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज, 9 फेब्रुवारी रोजी इटली आणि 14 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध खेळेल. त्यानंतर, 17 फेब्रुवारी रोजी नेपाळ विरुद्धचा त्यांचा शेवटचा साखळी सामना मुंबईत होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि सध्या सुरु असलेल्या तणावामुळं बांगलादेशला हे सर्व सामने श्रीलंकेत हलवायचे आहेत, जिथं पाकिस्तान आधीच त्यांचे सामने खेळत आहे.
बीसीसीआय प्रतिसाद काय (T20 World Cup Controversy ) :
बीसीसीआयच्या सूत्रांनी बांगलादेशची मागणी पूर्णपणे अव्यवहार्य असल्याचं म्हटलं आहे. बोर्डाचं म्हणणं आहे की स्पर्धा सुरु होण्यास फक्त एक महिना शिल्लक असल्यानं सामने स्थलांतरित करणं एक दुःस्वप्न ठरेल. बीसीसीआयच्या मते, केवळ स्थळ बदलणं हे एक आव्हानच नाही तर विरोधी संघांचा प्रवास, हॉटेल बुकिंग, प्रसारण पथक व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था इतक्या कमी वेळेत पुनर्रचना करणं जवळजवळ अशक्य आहे. बोर्डानं स्पष्ट केलं आहे की एका देशाच्या इच्छेनुसार संपूर्ण स्पर्धेची रचना बदलता येणार नाही.












