T20 World Cup : आयसीसीनं बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. बोर्डानं आयसीसीला त्यांचे टी-20 विश्वचषक सामने भारतातून हलवण्याची विनंती केली होती. आयसीसीनं ही विनंती फेटाळून लावली आहे. आयसीसीनं म्हटलं आहे की भारतात बांगलादेश संघाला कोणताही धोका असल्याचं दर्शविणारी कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. मंगळवारी आयसीसी अधिकाऱ्यां आणि बीसीबी यांच्यात ऑनलाइन बैठक झाली.
काय म्हणालं आयसीसी :
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयसीसीनं बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कळवलं की भारतात खेळताना बांगलादेश संघाला कोणताही विशिष्ट किंवा विश्वासार्ह धोका असल्याचं दर्शविणारी कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. त्यामुळं, स्पर्धेचं वेळापत्रक किंवा ठिकाण बदलण्याचा कोणताही आधार दिसत नाही.
बांगलादेशनं केली होती मागणी :
ही बैठक 4 जानेवारी रोजी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आपत्कालीन बैठकीनंतर झाली. त्या बैठकीत, बोर्डानं आयसीसीला औपचारिकपणे ईमेल पाठवून त्यांचे सामने भारतातून हलवण्याची विनंती केली. बोर्डानं म्हटलं आहे की बांगलादेशी खेळाडू, संघ अधिकारी, बोर्ड सदस्य आणि इतर भागधारकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन त्यांनी असं केलं आहे.
आयसीसीनं फटकारलं :
दरम्यान, ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आयसीसीने बीसीबीला सांगितलं आहे की ते स्थळ बदलण्याची विनंती नाकारत आहे. बांगलादेशला स्पर्धा खेळण्यासाठी भारतात जावं लागेल अन्यथा गुण गमावण्याचा धोका पत्करावा लागेल. मात्र, बीसीबीनं असा कोणताही अल्टिमेटम मिळाल्याचं नाकारलं आहे.
बांगलादेश ईडन गार्डन्सवर तीन सामने खेळणार :
बांगलादेश 2026 च्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर तीन सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी त्यांना गट क मध्ये स्थान देण्यात आलं आहे. बांगलादेश 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज, 9 फेब्रुवारी रोजी इटली आणि 14 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध ईडन गार्डन्सवर त्यांचे सामने खेळेल. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बांगलादेशचा सामना नेपाळशी होईल. सामन्यांचं वेळापत्रक बदल करणं देखील आयसीसीसाठी कठीण आहे कारण सामन्यांची तिकिटं ऑनलाइन विकली जात आहेत.










