Amol Kolhe is angry with Indigo airline : इंडिगो एअरलाईन्सच्या २०० पेक्षा अधिक विमानांचे वेळापत्रक कोलमोडले असल्याने हजारो प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा फटका शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांना देखील सहन करावा लागला. मात्र, या सावळ्यावर गोंधळावर त्यांनी फार तिखट प्रतिक्रिया दिली आहे. इंडिगो एअरलाईन्स कडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सलग दुसऱ्या दिवशी इंडिगो एअरलाईन्सच्या नियोजनशून्य कारभाराचा आणि पायलट क्रू कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. पुण्यातू गेल्या दोन दिवसांत इंडिगोची १६ हून अधिक उड्डाणे रद्द झाली. तर १९ हून अधिक विमानांना प्रचंड विलंब झाला. या गोंधळाचे मूळ कारण विमानतळ प्रशासनाच्या कमी क्षमतेपेक्षा इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी असल्याचे समोर आलं आहे.
पुणे विमानतळावर विमाने उभी करण्याची क्षमता केवळ १० विमानांची आहे. मात्र, इंडिगोच्या गोंधळामुळे वेळेवर क्रू न मिळाल्याने कंपनीची ९ विमाने तासनतास पार्किंग बेमध्ये उभी आहेत. इंडिगोच्या अनेक विमानांना चालक दलाच्या उपलब्धतेसाठी जास्त वेळ लागत असल्याने पार्किंग बे दीर्घकाळ व्यापले जात आहेत. ज्यामुळे हा सावळा गोंधळ वाढला आहे. पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने इतर एअरलाईन्सची विमानेही वेळेवर उतरू शकली नाहीत, परिणामी काही विमानांना मुंबईला वळवावे लागले, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष धोके यांनी दिली आहे.
‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..!
इंडिगोच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका खासदार अमोल कोल्हे यांनाही बसला आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी इंडिगोच्या सेवेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय, असे अमोल कोल्हेंनी पोस्ट करत म्हटले आहे.
देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..!
सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. 😀
३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला… pic.twitter.com/0zIbTtqdeO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2025
कालच हे सांगितलं असतं तर आम्ही बस किंवा ट्रेनने जोधपूरला गेलो असतो.
पुण्याहून जोधपूरला लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या एका प्रवाशाने याबद्दल संताप व्यक्त केला आहे. “आम्ही पुण्यावरुन जोधपूरला जात होतो. पण इंडिगोने फ्लाईट रद्द झाल्याचा आम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही. आम्ही सकाळी ५ वाजता निघालो होतो आणि माझ्यासोबत माझी पत्नीही आहे. कालपण आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनी आज चालू होईल असं सांगितलं. पण आजही फ्लाईट कॅन्सल झाली. कालच हे सांगितलं असतं तर आम्ही बस किंवा ट्रेनने जोधपूरला गेलो असतो. आजपासून लग्नाचे सर्व कार्यक्रम सुरू होत आहेत. त्यामुळे कमीत कमी गाईडलाईन तरी द्यायला हवी होती, असं त्या प्रवाशानं म्हटलं आहे.











