Arvind Kejriwal | दिल्लीतील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात (Delhi Liquor Policy Case) राउज एवेन्यू कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. कोर्टानं आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा दिला आहे. अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्या दोघांनाही कोर्टानं क्लीन चीट दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर केजरीवालांना अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचा – राज्यसभा तिकिटासाठी ठाकरे गटात चुरस; इच्छुकांची धावपळ, शरद पवार काय भूमिका घेणार?
कोर्टानं निकाल देताना काय म्हटलं?
दारू घोटाळा प्रकरणाता निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, कोर्ट कोणत्याही आरोपांवर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा त्याच्यासोबत भक्कम असा पुरावा असेल. नुसता दावा करून चालणार नाही पर्याप्त पुरावा असायला हवा. तसेच तपास यंत्रणेने दिलेले पुरावे हे अपर्याप्त आणि कमजोर आहेत, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
निर्दोष मुक्तता झाल्यानंतर केजरीवाल काय म्हणाले?
कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल भावूक झाले होते. “माझ्याविरोधातलं हे प्रकरण खोटं होतं. आमच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरूंगात टाकण्यात आलं. सोबत एका विद्यमान मुख्यमंत्र्याला त्याच्या घरात जाऊन अटक करून तुरूंगात टाकलं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांनी मिळून सर्वात मोठा कट रचला होता”, असा आरोप केजरीवालांनी केला आहे.
दरम्यान, कोर्टाने सर्वात आधी राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त राहिलेल्या कुलदीप सिंह यांना निर्दोष मुक्त केले. त्यांच्यानंतर मनीष सिसोदिया यांना कोर्टानं दिलासा दिला. नंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोष सुटकेचे आदेश दिले.












