Arvind Kejriwal On PM Narendra Modi | नुकतीच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणातून (Delhi Liquor Policy Case) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्या दोघांनाही कोर्टानं क्लीन चीट दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर केजरीवालांना अश्रू अनावर झाले होते.
हेही वाचा – अगं…थांब…थांब..! साक्षीचा डान्स, धोनीची फजितीच फजिती..
दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लगेचच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. “माझ्याविरोधातलं हे प्रकरण खोटं होतं. आमच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरूंगात टाकण्यात आलं. सोबत एका विद्यमान मुख्यमंत्र्याला त्याच्या घरात जाऊन अटक करून तुरूंगात टाकलं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांनी मिळून सर्वात मोठा कट रचला होता”, असा आरोप केजरीवालांनी केला होता.
राजकारणात सक्रिय होताच केजरीवालांची पंतप्रधान मोदींवर टीका
यानंतर आता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल राजकारणात सक्रिय झाले आहेत. राजकारणात सक्रिय होताच त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवालांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, रशियाकडून भारताला तेल खरेदीची परवानगी देणारा अमेरिका कोण होता? भारताला अमेरिकेची परवानगी घेण्याची काय गरज आहे? असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला.
पुढे मोदींवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले की, मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही प्रत्येक पावलावर ट्रम्प समोर झुकलात. तुमची त्यांच्यासमोर बोलण्याची हिम्मतही झाली नाही. हे सगळं पाहताना देशवासियांना खूप वेदना झाल्या. अशी काय मजबुरी आहे मोदीजी तुमची की तुम्ही ट्रम्पसमोर नतमस्तक होता, अशी टीका केजरीवालांनी केली.
केजरीवालांनी केली मोदींच्या राजीनाम्याची मागणी
भारत देश 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आपल्या देशात एकापेक्षा एक वीर योद्धांचा जन्म झालेला आहे. आजपर्यंत भारताने कुठल्याही देशासमोर आपली मान झुकवलेली नाहीये. आजपर्यंत भारताचं नेतृत्व इतकं कमजोर नव्हतं. तुमच्या कुठल्या मजबुरीचा फायदा जर ट्रम्प उचलत असतील तर कृपया भारताच्या हितासाठी राजीनामा द्या. भारत मातेला झुकवू नका, कारण सर्व देशवासियांना खूप वेदना होत आहेत, असा घणाघातही केजरीवाल यांनी केला.












