Balu Mama’s Prophecy : “तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्यांना मारणार, कळपातला शोधून काढणार अन् शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार”, हो ही भाकणूक आहे आदमापूरच्या बाळुमामांची. कोल्हापूरातील प्रसिद्ध देवस्थान आदमापूर येथील बाळूमामा भंडारा महाप्रसादा दिवशी भाकणूक पार पडली. भाकणूकीच्या कार्यक्रमात कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांनी युद्ध, राजकारण, महागाईसह विविध क्षेत्रांबाबतील धरकाप उडवणारी भविष्यवाणी करण्यात केलीय. त्यामुळे बाळू मामाची भाकणूक, भक्तांची धाकधूक वाढवणारी ठरलीय. या कार्यक्रमाला बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्यासह लोखो भाविक उपस्थित होते.
मराठी वर्षातील शेवटची भाकणूक असल्याने या कार्यक्रमाकडे भाविक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं विशेष लक्ष लागले होते. रविवारी पहाटे चार वाजता सुरू झालेली ही भाकणूक साडे सहा वाजता संपली. तब्बल अडीच तास सुरु असलेली ही भाकणूक ऐकायला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी ऐकून तुमचाही थरकाप उडल्याशिवाय रहाणार नाही.
चीन आणि उत्तर कोरिया भविष्यात जगासाठी धोकादायक
आखाती देशांमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. इस्लामिक राष्ट्रे आपापसात युद्ध करतील, देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. अश्यातच भारत-पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता भाकणुकीत सांगण्यात आली. पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल, भारतीय सैनिक सीमेवर शौर्याने लढतील. जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करताना चीन आणि उत्तर कोरिया भविष्यात जगासाठी धोकादायक ठरू शकतात, असे सांगण्यात आले.
महागाईचा जनतेला मोठा त्रास सहन करावा लागेल
आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना महागाई वाढून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागेल असे सांगण्यात आले. याशिवाय रेल्वे, मोटार आणि विमान अपघातांच्या घटनाही वाढू शकतात. सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होईल. दरवाढीमुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण होईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार सुरू राहतील आणि भारतीय उत्पादनांना मागणी वाढेल, असेही भाकीत करण्यात आले.
राजकारणातही मोठी उलथापालथ होईल
मोठे पक्ष सत्तेपासून दूर राहतील, तर लहान पक्षांची भूमिका नावाजन्याजोगी असेल. राजकारणातही मोठी उलथापालथ होईल. काही राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यांत अडकून तुरुंगात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. देशात मोठ्या चळवळी उभ्या राहतील आणि नव्या कायद्यांची अंमलबजावणी होत राहील. समान नागरी कायदा लागू होण्याबाबतही संकेत देण्यात आले. धार्मिक आणि सामाजिक घडामोडींविषयी बोलताना संस्कृती आणि हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदुराष्ट्र होईल. अनेक देशांत हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण वाढेल, असे त्यांनी सांगितले.
बारा वर्षाची मुलगी आई बनणार..
विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल. मानवाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतील. मानसाचं आयुष्य कमी होईल. कोरोनापेक्षा मोठा आजार येईल. बारा वर्षाची मुलगी आई बनेल. तरुण पिढी वाम मार्गाला जाईल. भाऊ बहिणीत्या नात्याला कलंक लागेल. ३५ वर्षांचं म्हातारपण येईल. ऋतूंचे चक्र विस्कळीत होईल, अवकाळी पावसाचे प्रमाण वाढेल, तसेच काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. हवामान नकोसा बदल होईल.
सुनामी, वादळ, भूकंप नैसर्गिक आपत्तींचा धोका
नद्या, तलाव, जलाशय आटण्याची शक्यता वर्तविण्यात आली. नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पांना गती मिळेल, तर कर्नाटकातील एखाद्या जलाशयाला तडा जाऊन नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले. याशिवाय सुनामी, वादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. भविष्यात जंगलातील प्राणी गावांकडे येतील आणि मानवी जीवनशैलीतही बदल होतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच पशुधनाचे महत्त्व वाढेल आणि दूध-दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.
चंद्र सूर्याची आकस्मात टक्कर होईल
जगात तीन दिवस अंधार पडेल, जग दुनिया दिसणार नाही. चंद्र सूर्याची आकस्मात टक्कर होईल. माणूस काही दिवसांनी राहण्यासाठी आकाशातील तारे ग्रह या जागेचा शोध घेतील. शंभर वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल. येणारं राज्य गुंडांचं येणार आहे. त्यामुळे बाळुमामाला विसरु नका. वागा वागा सत्त्या न वागा, माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा असं म्हणतं कार्यक्रमाच्या शेवटी भक्तांना धर्माचरण आणि सेवा यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. आदमापूर गाव प्रतिपंढरपूर होईल, भविष्यात आदमापूर हे करवीर आणि पंढरपूरप्रमाणे मोठे धार्मिक केंद्र बनून येथे भाविकांची मोठी गर्दी होईल, असेही भाकीत करण्यात आले.
ज्याच्या अंगी भक्ती, तोच सुखाने खाणार
या सर्व भाकणुकीतून एकच संदेश देण्यात आला. काळ बदलतोय, परिस्थिती कठीण होऊ शकते, पण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या जोरावरच माणूस टिकून राहू शकतो. भविष्यात कितीही संकटं आली तरी ज्याच्या अंगी भक्ती, तोच सुखाने खाणार हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला. त्यामुळे भीती न बाळगता धर्माचरण, सेवा आणि माणुसकी जपणं हेच खऱ्या अर्थाने आवश्यक असल्याचं या भाकणुकीतून सांगण्यात आलं.






