Rushikesh Vaidya | एकिकडे नाशिकमध्ये (Nashik) भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशातच आता दुसरीकडे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील (Vasai) एका भोंदूबाबाने पुण्यातील (Pune) एका महिलेवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे.
हेही वाचा – रूपाली चाकणकर ते रॅकेट चालवत होत्या? खरात प्रकरणात रूपाली ठोंबरेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या, रोज एक महिलेचा…
पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, 2023 मध्ये तिची वसईमधील ऋषिकेश वैद्य या तरूणासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर ऋषिकेशने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेतला आणि तिला अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधली. नंतर डीसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्याला गेला होता. पुण्यात गेल्यानंतर त्याने तिला मांजरी येथील एका लॉजमध्ये नेलं आणि तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला.
नराधम ऋषिकेश वैद्य एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडित महिलेचे काही अश्लील छायात्रिचे काढली होती. त्यानंतर तो त्या छायाचित्रांच्या आधारे तिला सतत ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलवत होता. मे 2025 मध्ये त्याने वसईतील एका हॉटेलमध्ये तिला भेटायला बोलावले आणि तिच्यावर पुन्हा एकदा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.
नाशिकमधील अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवत आपल्या पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस स्थानकात आरोपी ऋषिकेश वैद्यविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच ऋषिकेशने धर्मगुरू असल्याचं भासवून अनेक तरूणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा खुलासाही पीडित महिलेना केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या या तक्रारीनंतर ऋषिकेश वैद्यविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे प्रकरण पुढील कारवाईसाठी पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. तर आरोपी ऋषिकेश वैद्य हा फरार असून पोलीस पथके त्याला पकडण्यासाठी रवाना झाली आहे. खरात प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली असताना आता हे नवीन प्रकरण उघडकीस आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
ऋषिकेश वैद्य कोण आहे?
ऋषिकेश वैद्य हा वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आहे. तो ‘आमची वसई’ या नावाच्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून ऋषिकेश वैद्य हा वसईत अनेक सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करायचा. त्याने वसईमध्ये अनेक धार्मिक उत्सव, दीपोत्सव आणि अध्यात्मिक प्रवचने केली होती. याद्वारे त्याने अनेक महिलांना आणि तरूणींना आपल्याकडे आकर्षित करत आपल्या जाळ्यात ओढले होते.












