Chandrakant Patil Kharat case controversy : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे (Charlatan Ashok Kharat) राज्यातील अनेक नेते अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना तर या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामी देण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर आता दुसरी विकेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांची पडणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महायुतीतीलच नेत्याचे मंत्री पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून थेट राजीनाम्याची मागणी (Demand for resignation) केली आहे.
अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन महायुती सरकारने तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटन मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून हा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असल्याने त्यांच्या खात्याकडून त्याला मान्यता देण्यात आली होती. याप्रकरणी आता शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मी निधी देतो, तुम्हीकाळ्याचं पांढरे करून द्या
‘भोंदू बाबा कॅप्टन खरातची हुजरेगिरी करण्यात आपले चंद्रकांतदादा पण कुठे मागे नाहीत. 31 मार्च, 2018 रोजी भोंदू कॅप्टन खरातच्या ईशान्येश्वर देवस्थान, मिरगांव, ता.सिन्नर संस्थानच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विकास कामांसाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाने 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर केल्याचा जीआर हाती लागलाय. तेव्हा पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. आता मी तुम्हाला निधी देतो तुम्ही माझं काळ्याचं पांढरे करून द्या,या स्कीम अंतर्गत दादांचे देखील खरात सोबत आर्थिक संबंध असल्याचा तपास पोलिसांनी घ्यावा,’ अशी सोशल मिडीया पोस्ट शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा झाला पाहिजे – धंगेकर
‘भोंदू बाबा अशोक खरात सोबत मंत्री चंद्रकांत पाटील सह पुण्यातील खासदाराची सुद्धा ऊठबस होती. नाशिक मधील ईशान्यश्वर देवस्थानाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निधी मंजूर करून दिला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा झाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्यांना मंत्रिपदावरून हटवलं पाहिजे,’असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.











