नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेत काँग्रेस पक्षाला दारूण पराभव स्विकारावा लागला. आता त्यामागील काही कारणं पुढं येत आहेत. अंतर्गत वादामुळे पक्षाला मोठा फटका बसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं काँग्रेसकडून पक्षाविरोधात विधानं करणाऱ्या ७ मोठ्या नेत्यांना घराचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आदित्य पासवान, शकीलुर रहमान, राजकुमार शर्मा, राजकुमार राजन, कुंदन गुप्ता, कांचना कुमारी आणि नालंदा रवी गोल्डन या नेत्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. बिहार काँग्रेक कडून ही कारवाई करण्यात आली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार विजय मिळवला. तर काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली असून सात नेत्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे.
हेही – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार, पुढील सुनावणीपर्यंत सस्पेंस कायम..
या ७ नेत्यांची ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष कपिल देव प्रसाद यादव यांनी सांगितले की, निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस सेवा दलाचे माजी उपाध्यक्ष आदित्य पासवान, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष शकीलुर रहमान, किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकुमार शर्मा, युवा काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष राजकुमार राजन, मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष कुंदन गुप्ता, बांका जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षा कांचना कुमारी आणि नालंदा जिल्हा नेते रवी गोल्डन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. मात्र त्यांच्याकडून मिळालेलं स्पष्टीकरण असमाधानकारक होतं त्यामुळं त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
प्रिंट आणि सोशल मीडियावर तिकीट खरेदी केल्याचा आरोप
निलंबित नेत्यांनी आपल्या जाहीर वक्तव्यातून पक्षाची बदनामी केली असल्याचे शिस्तपालन समितीने निलंबनाची कारवाई करताना असं म्हटलं आहे. या सर्व नेत्यांनी सातत्याने पक्ष व्यासपीठाबाहेर काँग्रेसच्या निर्णयांविरुद्ध भाष्य केलं होतं. तसचं प्रिंट आणि सोशल मीडियावर तिकीट खरेदी केल्याचा आरोप करत पक्षाच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान पोहोचवण्यात आलं आहे, त्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसचं समितीनं हेही सांगितलं की, पक्षाने पूर्णपणे पारदर्शकरित्या निरीक्षकांची नियुक्ती, अधिकृत उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पक्षाच्या विरोधात विधाने केल्यामुळे कारवाई
काँग्रेसचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, बिहार प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीने सात नेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. पक्षाच्या मुख्य तत्त्वांबद्दल, शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराबद्दलच्या हलगर्जीपणाबद्दल आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.












