डहाणू : पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे दोन डबे वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्सप्रेसचे डबे निखळले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच, प्रवाशी तात्काळ या एक्सप्रेसमधून खाली उतरले. हे दोन्ही डब्बे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर होते. त्यामुळे प्रवाशी मदत कधी मिळेल? याची वाट पाहात रुळा शेजारी उभे असल्याचं दिसून आलं.या घटनेचा एक व्हिडीओ ही समोर आला असून त्यात इंजिनपासून डब्बे वेगळे झाल्याचे दिसत आहे. शिवाय प्रवाशाही रुळावर उतरलेले दिसत आहे. या घटनेचा परिणाम डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर नक्कीच झाला आहे. डाऊन मार्गावरील वाहतूक चाळीस मिनिटं ठप्प झाली होती. काही वेळाने अमृतसर एक्सप्रेसचे डबे जोडून गाडी गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
काय घडलं?
पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकाजवळ, आज एक मोठी दुर्घटना टाळली. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या अमृतसर एक्सप्रेसचे दोन डब्बे अचानक गाडीपासून निसटून वेगळे झाल्याचा प्रकार घडला. गाडी वेगात असतानाच डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे आणि गाडीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
वाहतुकीवर परिणाम ?
या घटनेनंतर डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक जवळपास चाळीस मिनिटे ठप्प झाल्याने परिणामी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या विलंबाने धावल्या. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, या अचानक घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी कर्मचारी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि वेगळे झालेले डबे पुन्हा गाडीला जोडण्यात आले आणि गाडी पुढे गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवाशांना झालेल्या भीतीचा धसका अद्याप कायम आहे.
जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी
रेल्वेच्या सुरक्षाविषयक बाबींकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनीही या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डहाणू परिसरात झालेल्या या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने गंभीर दुर्घटना टळली असली तरी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे.